Ladaki Bahin Yojana : १ कोटींहून अधिक लाडक्या बहीणींची ई-केवायसी; पुन्हा मुदतवाढ मिळणार?

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेला लाभार्थी महिलांकडून प्रतिसाद मिळत आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक महिलांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर जवळ आलेली असताना, सरकारने या मुदतीत वाढ करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ई-केवायसीची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर आहे आणि सध्या दररोज 4 ते 5 लाख महिलांची प्रक्रिया पूर्ण होत आहे. मात्र, अलीकडेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक महिलांची महत्त्वाची कागदपत्रे खराब झाली आहेत किंवा गमावली गेली आहेत. त्यामुळे, पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
या योजनेच्या 1 कोटीहून अधिक महिलांची केवायसी पूर्ण झाली असताना, काही महिलांना मात्र तांत्रिक अडचणी येत होत्या. ज्या महिला एकल आहेत, ज्यांचे पती किंवा वडिलांचे निधन झाले आहे किंवा ज्या घटस्फोटित आहेत, अशा महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना अडथळे येत होते. यावर मार्ग काढण्यासाठी महिला व बालविकास विभागाने तातडीने वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्याची घोषणा केली आहे. या महिलांना आता ई-केवायसी करताना पती/वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोटाचे कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती तटकरे यांनी दिली.





