नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सभेच्या आठव्या अधिवेशनाच्या प्रारंभिक सत्राचे उद्घाटन केले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी समावेशकता, सन्मान आणि सामूहिक समृद्धीचा स्रोत म्हणून सौर ऊर्जेचा वापर करणे या मानवतेच्या सामाईक आकांक्षेचे प्रतीक आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. हवामान बदलाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. या धोक्याचा सामना करण्यासाठी तातडीने आणि ठोस पावले उचलण्याची गरज आहे. भारत हवामान बदलाशी लढण्यासाठी वचनबद्ध आहे आणि निर्धारपूर्वक पावले उचलत आहे. सौर ऊर्जेचा अवलंब आणि वापर करण्यास प्रोत्साहन देऊन या जागतिक आव्हानाला तोंड देण्याच्या दिशेने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे यावर त्यांनी भर दिला. समावेशनाची कल्पना भारताचा विकास प्रवास परिभाषित करते. दुर्गम भागातील घरे प्रकाशमय करण्याचा आमचा अनुभव, ऊर्जा समता हा सामाजिक समतेचा पाया आहे या आमच्या विश्वासाला दुजोरा देतो. परवडणाऱ्या आणि स्वच्छ ऊर्जेची उपलब्धता समुदायांना सक्षम करते, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देते आणि वीज पुरवठ्यापलीकडील संधी खुल्या करते. त्या म्हणाल्या की सौर ऊर्जा म्हणजे केवळ वीज निर्मिती नाही तर सक्षमीकरण आणि समावेशक विकास देखील आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. राष्ट्रपतींनी सर्व सदस्य देशांना पायाभूत सुविधांपलिकडे जाऊन विचार करण्याचे आणि लोकांच्या जीवनावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्पांचा विस्तार करताना, आपण या प्रदेशाचे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल याची काळजी घेतली पाहिजे कारण पर्यावरण संवर्धन हे हरित ऊर्जेकडे वळण्याचे मुख्य कारण आहे. आपण केवळ आपल्या स्वतःच्या देशासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आणि केवळ वर्तमान पिढीसाठीच नव्हे तर भावी पिढ्यांसाठी अधिक समर्पणाने काम केले पाहिजे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.