पुणे – धावत्या एसटीत हृदयविकाराच्या झटका आल्याने बस चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जालिंदर रंगराव पवार (पळशी, तालुका खटाव, जिल्हा-सातारा) असे मृत पावलेल्या चालकाचे नाव आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी 25 प्रवाशांचा जीव वाचवला. जालिंदर यांच्या मृत्यूने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.
पालघर विभागाच्या वसई आगाराची बस होती. ती पुणे-सातार महामार्गावरून म्हसवडकडे जात होती. बसमध्ये 25 प्रवाशी प्रवास करत होते. दरम्यान,पुणे-सातारा महामार्गावरील वारेव (भोर) या ठिकाणी बुधवारी दुपारी बस आली असता चालक जालिंदर यांना चक्कर येऊ लागली. त्यांना हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बस रस्त्याच्या बाजूला घेतली. मात्र काही वेळात त्यांचा मृत्यू झाला.
वसईहून बस दुपारी 12.30 वाजता स्वारगेट बसस्थानकात आली होती. यावेळी बसचालक संतोष कांबळे यांच्या जागी जालिंदर पवार हे बदली चालक म्हणून आले. वरवे गावच्या हद्दीत आल्यानंतर एसटी बसचा वेग मंदावला. याबाबत कंडक्टरने जालिंदर यांना कारण विचारल्यावर त्यांनी चक्कर येत असल्याचं सांगून बस रस्त्याच्या कडेला थांबवली. वाहकाला पवार यांच्याशी पुन्हा बोलायचे होते मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर वाहकाने त्यांना प्रवाशांच्या मदतीने नसरपूर येथील खासगी रुग्णालयात नेले. उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.