भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे गौरवोद्गार : बारामतीकरांनी घेतला सामना बघण्याचा आनंद
जळोची – बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममधील धावपट्टी आणि मैदान उच्च दर्जाचे असून आमच्यासारख्या खेळाडूंना नक्कीच उत्साह देणारे आहे, असे गौरवोद्गार भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू केदार जाधव यांने काढले.
बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये रणजी सामने खेळविण्यास बीसीसीआयने मान्यता दिल्यानंतर आंतरराष्ट्रीय, रणजी, आयपीएलचे सामने खेळलेल्या क्रिकेटपट्टूचा नुकताच पहिला सामना या स्टेडियमवर खेळविला गेला. महाराष्ट्र “ए’विरुद्ध महाराष्ट्र “बी’मध्ये झालेल्या सामन्यात केदार जाधवचा खेळ बारामतीकरांना प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला. सामन्यानंतर जाधव बोलत असताना त्याने वरील गौरवोद्गार काढले.
केदार जाधव म्हणाला की, या मैदानावर जास्तीत जास्त सामने व्हावेत, तसेच या भागातील जास्तीत जास्त खेळाडू महाराष्ट्रासह भारतासाठी खेळावेत. बारामती सारख्या ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम क्रिकेटप्रेमींसाठी खुले झाल्याने या स्टेडियममधून लवकरच उदयोन्मुख क्रिकेटपटू निर्माण होतील असा, विश्वास व्यक्त केला. बारामती आणि परिसरात मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी व क्रिकेटपट्टू आहेत. मात्र, त्यांना आजवर चांगल्या दर्जाचे मैदान व खेळपट्टी मिळत नसल्याची खंत होती. मात्र, आता डॉ. आंबेडकर स्टेडियमला बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय खेळपट्टीचा दर्जा दिला असल्याने या मैदानातून क्रिकेटपटूना आपले कौशल्य विकसित करता येणार असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
मैदानाची वैशिष्ट्ये
मुख्य ग्राऊंडचा परीघ : 400 रनिंग मीटर
मुख्य ग्राऊंडचे एकूण क्षेत्रफळ : 12300 चौरस मीटर
मुख्य खेळपट्ट्या : 8 व सरावासाठी 14
खेळाडूंच्या सुरक्षेसाठी चेन लिंक फेन्सिंग प्रवेशद्वार : 4
आसनक्षमता : 4350 व्यक्ती