Omar Abdullah : ‘EVM’बाबत अडचण वाटत असेल तर निवडणूक लढवू नका…’; ओमर अब्दुल्ला यांनी कॉंग्रेसला सुनावले !

Jammu and Kashmir | Omar Abdullah – जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेसच्या ईव्हीएमबाबतच्या संशयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, निवडणुकीच्या निकालासाठी त्यांनी स्वत: कधीही या मशीनला दोष दिला नाही. ईव्हीएम वापरून जर विजय झाला तर कॉंग्रेस तो साजरा करते आणि पराभव झाला तर ईव्हीएमला जबाबदार धरते या त्या पक्षाच्या भूमिकेवर अब्दुल्ला यांनी आक्षेप घेतला.
जेव्हा तुमचा पक्ष ईव्हीएमद्वारे शंभरहून अधिक खासदार जिंकून संसदेत पोहोचतो, तेव्हा तुम्ही याला तुमचा विजय समजता. पण काही महिन्यांनंतर, जेव्हा तुमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल येत नाहीत, तेव्हा तुम्ही ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता.
हे योग्य नाही असे नमूद करून ओमर पुढे म्हणाले की, जेव्हा तुम्हाला एकच ईव्हीएम वापरून शंभरहून अधिक खासदार मिळतात आणि तुम्ही तो तुमच्या पक्षाचा विजय म्हणून साजरा करता, आणि काही महिन्यांनंतर तुम्ही मागे फिरून असे म्हणू शकत नाही की आम्हाला हे ईव्हीएम आवडत नाहीत कारण आता निवडणुकीचे निकाल आम्हाला हवे तसे येत नाहीत.
तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यासारखे बोलत असल्याबाबत ओमर यांना विचारले असता ते म्हणाले की, देव असे कधीही न करो. पण जे बरोबर आहे ते बरोबर आहे. एक दिवस मतदार तुम्हाला निवडतात, दुसऱ्या दिवशी ते निवडत नाहीत.
आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अब्दुल्ला यांनी स्वतःचे उदाहरण दिले. मी लोकसभा निवडणुकीत हरलो होतो, पण नंतर विधानसभा निवडणुकीत बहुमताने जिंकलो. मी कधीही यंत्रांना दोष दिला नाही. पक्षांना मतदान व्यवस्थेवर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणूक लढवू नये.
ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधी पक्षांना, विशेषत: काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले की, तुम्हाला जर ईव्हीएममध्ये अडचण असेल, तर तुम्ही तुमच्या मुद्यावर ठाम राहा. तुम्हाला ईव्हीएममध्ये समस्या असल्यास, तुम्ही त्या समस्यांमध्ये सातत्य राखले पाहिजे. जर तुम्हाला ईव्हीएममध्ये अडचण असेल तर तुम्ही निवडणूक लढवू नका, असे ते म्हणाले.





