Delhi Election 2025 : “दिल्लीवर ‘आप-त्ती’ नको.. तर हवा विकासाचा प्रवाह”; पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

Delhi Election 2025 – देशाच्या राजधानीला विकासाची गरज आहे, आपत्तीची नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत दिल्लीत कमळ फुलणार आहे. आगामी २५ वर्षे दिल्लीसाठी खूप महत्त्वाची आहेत. दिल्लीला विकासाचा प्रवाह हवा आहे. त्यामुळे भाजपला मतदान करा.
भाजप हा सेवेच्या भावनेने काम करणारा पक्ष आहे. दिल्लीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मी दिल्लीतील जनतेला भाजपला संधी देण्याचे आवाहन करण्यासाठी आलो आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
दिल्लीच्या जपानी पार्कमध्ये परिवर्तन रॅलीला संबोधित करताना मोदी बोलत होते. दिल्लीच्या विकासाचे महत्त्व सांगताना मोदी म्हणाले की, आपण 2025 मध्ये आहोत. 21व्या शतकाला आता 25 वर्षे उलटून गेली आहेत. या काळात दिल्लीत तरुणांच्या दोन-तीन पिढ्या वयात आल्या आहेत. आता येणारी 25 वर्षे भारताच्या भविष्यासाठी, दिल्लीच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची आहेत.
या 25 वर्षांत भारत एक विकसित राष्ट्र बनताना दिसेल. आम्ही त्याचे भागीदार होऊ. यामुळे भारत आधुनिकतेच्या एका नव्या टप्प्यातून जात आहे. विकसित भारताच्या या प्रवासातील एक मोठा टप्पा लवकरच येणार आहे. जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल.
दिल्लीत भाजपचे सरकार का यावे, हे स्पष्ट करताना मोदी म्हणाले, दिल्लीने गेल्या 10 वर्षात ज्या प्रकारचे राज्य सरकार पाहिले आहे ते ‘आप-दा’ पेक्षा कमी नाही. हे दिल्लीतील जनतेला आज चांगलेच कळले आहे. भाजपवर नागरिकांचा हा विश्वास आहे, कारण भाजप हा सुशासन आणणारा पक्ष आहे. भाजप हा सेवेच्या भावनेने काम करणारा पक्ष आहे. भाजप स्वप्ने पूर्ण करणारा पक्ष आहे.
दिल्ली विधानसभेतही कमळ
दिल्लीत भाजपची सत्ता येईल, असा दावा करत पंतप्रधान मोदी म्हणाले, दिल्ली विधानसभेतही कमळ फुलणार आहे, असा मला विश्वास आहे. मी दिल्ली भाजपच्या सर्व कष्टकरी कार्यकर्त्यांना सांगेन की, दिल्लीतील प्रत्येक कार्यकर्त्याला पूर्ण समर्पणाने भेटून त्यांना आगामी वर्षांसाठी भाजपच्या संकल्पाची जाणीव करून द्यावी. दिल्लीला जगातील सर्वोत्तम राजधानी म्हणून गौरव मिळवून देणारा भाजपच आहे. दिल्लीला अशी जगाची राजधानी बनवायची आहे, जिथे भारताच्या वारशाची भव्यता पाहता येईल.





