Yogi Adityanath : तुम्ही स्वतःला भविष्यातील पंतप्रधानपदाचे दावेदार मानता का? मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचं सूचक वक्तव्य म्हणाले…
Yogi Adityanath : नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Yogi Adityanath : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच काळात राष्ट्रीय राजकारणातही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा सुरू आहे. २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांचे नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांनी या चर्चेवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘राष्ट्र प्रथम’ हेच मार्गदर्शक तत्त्व
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत योगी आदित्यनाथ यांना भविष्यातील पंतप्रधानपदाच्या दावेदारीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच २०२७ नंतर त्यांची भूमिका काय असेल आणि उत्तर प्रदेश हेच त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र राहणार का, असा सवालही करण्यात आला.
यावर योगी आदित्यनाथ यांनी आपण सार्वजनिक जीवनात ‘राष्ट्र प्रथम’ या विचाराने प्रवेश केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाने उत्तर प्रदेशच्या जनतेची सेवा करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली असून, हीच आपल्यासाठी मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्तर प्रदेशला आर्थिक, सामाजिक आणि प्रशासकीयदृष्ट्या पुढे नेण्यावर आपले संपूर्ण लक्ष असल्याचेही योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधानपदाच्या चर्चेवर योगींचं मौन?
योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारीबाबत सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी थेट दुजोरा दिलेला नाही, हे स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांचे लक्ष उत्तर प्रदेश आणि राज्याच्या विकासावर असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापत आहे. विविध पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असून योगी सरकारच्या कामगिरीसह रोजगार, विकास, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
अयोध्या, काशी आणि मथुरेच्या मुद्द्यावर योगींचं उत्तर
उत्तर प्रदेशातील शिक्षण आणि आरोग्यासारख्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी अयोध्येनंतर काशी आणि मथुरेचा मुद्दा पुढे केला जात असल्याचा दावा केला जातो. या प्रश्नावरही योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली.
अयोध्या, मथुरा आणि काशी ही उत्तर प्रदेशच्या वारशाचा भाग असल्याचे सांगत या स्थळांचे जतन आणि विकास दोन्ही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, वारसा आणि विकास हे परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत.






