Sandeep Deshpande : शरद पवारांसोबत जाताना कार्यकर्त्यांना विचारात घेतलं का? आता दबावाचे राजकारण करू नका; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना सध्या जोरदार उधाण आले आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक भूमिका मांडली आणि स्थानिक पातळीवर आढावा घेण्याच्या सूचना आपल्या जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिल्या.
मात्र, या विधानावर मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “शरद पवार आणि काँग्रेससोबत युती करताना कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला का? आता दबावाचे राजकारण करू नका,” असा थेट इशारा देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना दिला.
युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या युतीच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “2019 मध्ये महाविकास आघाडीत सामील होताना उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला का? तेव्हा असा सर्वे केला असता, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते.
एकच शिवसेना असती.” त्यांनी पुढे सांगितले की, सध्या राज्यात मराठी भाषा आणि हिंदी सक्तीच्या विरोधासारखे महत्त्वाचे मुद्दे आहेत. “आम्ही युतीपेक्षा महाराष्ट्राच्या आणि मराठी अस्मितेचा विचार करत आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून या मुद्द्यांसाठी लढत आहोत,” असे त्यांनी ठणकावले.
“अचानक सकारात्मकता आणि उत्साह कशाला?”
देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या अचानक बदललेल्या भूमिकेवरही टीका केली. “कालच्या शिवसेना वर्धापन दिनात जो उत्साह दिसला, तो गेल्या 19 वर्षांत कधीच दिसला नाही. अचानक बॅनर का लागायला लागले? संजय राऊत यांनी चार महिन्यांपूर्वी आम्हाला बाळासाहेबांचा फोटो लावण्यावरून विचारणा केली होती.
आता अचानक सगळे सकारात्मक कसे झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, “आज ठाकरे गटाचे 20 आमदार निवडून आले आहेत. जर 60 आमदार असते, तर हा उत्साह दिसला असता का? 2014 आणि 2017 मध्ये आम्ही युतीचा प्रस्ताव दिला तेव्हा शिवसैनिक सकारात्मक का नव्हते?” असेही संदीप देशपांडे यांनी विचारले.
“दबावाचे राजकारण खपवून घेणार नाही”
संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला स्पष्ट शब्दांत सुनावले की, युतीचा निर्णय हा मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील. “तुम्ही आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचा पक्ष पुढे नेण्याचा विचार करत आहात, यात काही गैर नाही. पण आमच्यावर दबाव टाकणे आम्ही सहन करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
तसेच, “शरद पवार आणि काँग्रेससोबत युती करताना कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला का? त्यासाठी बैठका घेतल्या का?” असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
युतीच्या चर्चांचा राजकीय संदर्भ
शिवसेना आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीबाबत सकारात्मकता दर्शवली असली, तरी संदीप देशपांडे यांच्या या टीकेने युतीच्या मार्गात अडथळे येण्याची शक्यता आहे. मनसेने सध्या मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीच्या विरोधावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे युतीचा निर्णय घेण्यापूर्वी मनसे आपल्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही, हे देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे.





