Sandeep Deshpande : राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता ; राज ठाकरे-एकनाथ शिंदेच्या युतीविषयी मनसे नेत्याचे मोठे विधान

Sandeep Deshpande : राज्यासह देशभात पुढच्या काही महिन्यात लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. त्या दृष्टीने प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहेत. त्यातच आता राज्यात नवीन राजकीय समीकरण जुळण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. यात महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे शिंदे गटाशी भविष्यात हातमिळवणी करण्याची शक्यता मनसेच्या नेत्याने वर्तवली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटीविषयी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. तसेच युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील, ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, असे म्हणत सूचक वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर “आताचे मुख्यमंत्री भेटतात, आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोलादेखील लगावला आहे.
पुढे बोलताना संदीप देशपांडे यांनी, “मुळात विषय असा आहे की, आताचे मुख्यमंत्री येऊन भेटतात तरी, आधीचे जे मुख्यमंत्री होते, ते भेटायचेच नाही कोणाला. जे काही महाराष्ट्राचे प्रश्न असतील, जनतेचे प्रश्न असतील, ते सन्मानिय राज ठाकरे घेऊन जातात मुख्यमंत्र्यांकडे. त्याच्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो, मार्ग निघतो. शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल, तर त्यात वावगं नाही.असे म्हणत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे एकत्र येणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
त्यासोबतच “राज कारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. 2024 च्या पोटात काय दडलंय? हे कोणाला माहीत. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल, तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल.”, असे संदीप देशपांडे म्हणाले.
तसेच “राज ठाकरेंकडे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आहे, वास्तूचा वारसा असेल काही लोकांकडे, पण विचारांचा वारसा आहे, तो राज ठाकरेंकडेच आहे. बाळासाहेबांचे विचार, त्यांची महाराष्ट्राबाबतची स्वप्न, त्यांची हिंदुत्वाबाबतची कास कोणाकडे असेल तर ती राज ठाकरेंकडेच. त्यांचे विचारही सर्व जनतेला आपलेसे वाटतात. कोणतंही राजकारण करताना मराठी माणसाला किंवा हिंदुत्वाला यश मिळालं पाहिजे, हे धोरण असलं पाहिजे.”
अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठीच्या निमंत्राविषयी बोलताना, “प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी कोणाच्याही निमंत्रणाची गरज नाही. प्रभू रामचंद्राच्या मनात आलं की, ते भक्तांनी दर्शनासाठी बोलावून घेतात. आम्हाला त्यांच्या दर्शनासाठी तिसऱ्या व्यक्तीच्या निमंत्रणाची गरज नाही. प्रभू रामचंद्रानं निमंत्रण दिलं की, आम्ही जाऊ.” असे म्हटले आहे.




