Uddhav Thackeray : मातोश्रीवर बैठकांचा सिलसिला! मराठवाड्यात शिवसेना-मनसे युती होणार? उद्धव ठाकरेंच्या महत्वाच्या सूचना, काय ठरलं?

Uddhav Thackeray : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही कंबर कसली असून त्या दृष्टीने तयारी केली जात आहे. मातोश्रीवर बैठकांचा सिलसिसा सूरू आहे. नुकतीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाड्यातील जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाप्रमुखांसोबत जिल्हा परिषद, पंचायत, नगर पंचायत, नगर परिषदेच्या निवडणुकांच्या तयारीबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत आगामी होणाऱ्या निवडणुका आपल्या पक्षाने महाविकास आघाडीसोबत कायम राहात लढायच्या की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती करून लढायच्या याविषयी स्थानिक पातळीवरील अंदाज घेऊन कळवा, अशी महत्वाची सूचना उद्धव ठाकरे यांनी दिली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता आगामी काही दिवसांत मराठवाड्यात राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं बोललं जात आहे.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
स्थानिक पातळीवरची ताकद ओळखून याबाबत काय निर्णय घ्यायचा याच्या सूचना करा. आपली कुठे ताकद आहे, याबाबत मला माहिती द्या असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. याशिवाय आघाडीसोबत निवडणूक लढवण्याबाबत काय मत आहे, ते लवकर मांडावे जेणेकरून आपल्याला वेळेत निर्णय घेता येईल.
तसेच १४ तारखेला होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याविरोधात उबाठाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात आंदोलन करा आणि महिला पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिंदूर पाठवा, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी बैठकीत केल्याची माहिती आहे.
नाशिकसह राज्यातही युतीचे संकेत
दरम्यान, काल १२ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष शिवसेना उबाठा आणि मनसे विविध मुद्यांवर आक्रमक भूमिका घेत रस्त्यांवर उतरले होते. या मोर्चात मोठ्या संख्येने दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या भव्य मोर्चाच्या माध्यमातून दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन अप्रत्यक्षपणे नव्या युतीचं बिगुल फुंगल आहे. यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी नाशिकसह राज्यातही युतीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.





