बीड : परळी येथील मृत महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परळीच्या बंगल्यावरून फोन आल्याने तपास थांबवण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, या प्रकरणातील संशयित वाल्मीक कराड यांची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुलं विचारतात, बाबांना का मारलं? एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले की, त्यांची मुलं सतत विचारतात, “बाबांना कोणी आणि का मारलं?” पतीच्या हत्येच्या तपासाबाबत पोलीस अधीक्षकांसोबत सकारात्मक चर्चा झाली असली, तरी तपासात प्रगती नसल्याचे त्यांनी नमूद केले. “केवळ तपास करतो, असे उत्तर मिळते. अशा परिस्थितीत जीवन ठेवून काय उपयोग?” असे म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “या महिन्यात न्याय मिळाला नाही, तर मी माझे जीवन संपवेन,” असा गर्भित इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तपास यंत्रणांना दिला आहे. परळीच्या बंगल्यावरून फोन आला, तपास थांबला ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, परळीच्या बंगल्यावरून फोन आल्यानंतर या हत्येच्या प्रकरणाचा तपास थांबवण्यात आला. “माझ्या पतीच्या हत्येचा तपास कोणाकडे द्या, पण आरोपींना अटक करा,” अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. तसेच, विजयसिंह बांगर यांनी दिलेल्या माहितीची सत्यता तपासली जात असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे, या प्रकरणातील सर्व कारभार वाल्मीक कराड सांभाळत असल्याचा दावा करत त्यांनी कराड यांच्या चौकशीची मागणी केली आहे. सध्या वाल्मीक कराड न्यायालयीन कोठडीत आहे. मुलांच्या डोक्यातील मारेकऱ्यांचे विचार काढण्यासाठी न्याय हवा पुढे बोलताना म्हणाल्या की, पती महादेव मुंडे यांच्याशी त्यांचे शेवटचे बोलणे झाले तेव्हा ते हसत-खेळत होते आणि त्यांच्यावर कोणताही तणाव नव्हता. “माझ्या मुलांच्या डोक्यातून मारेकऱ्यांचे विचार काढायचे असतील, तर मला न्याय मिळालाच पाहिजे,” असे त्या ठामपणे म्हणाल्या. या प्रकरणात तपास यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली आहे. या सनसनाटी प्रकरणाने परळीतील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून, तपास यंत्रणांवर दबाव वाढला आहे.