Sadabhau Khot : “देवेंद्र फडणवीस अनेक चांगले निर्णय घेतात, पण…”; सदाभाऊ खोतांचा थेट सवाल, म्हणाले “हे सरकार…”
Sadabhau Khot : यानंतर जनावरे जप्त करण्यात आली, तर पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Sadabhau Khot : राज्यात प्रथमच शेतकऱ्यांची जनावरं तुरुंगात टाकली जात आहेत. हे सरकार आंधळं, बहिरं आणि मुकं झालं असून सरकार नावाच्या भिंतीवर डोकं फोडावं, अशी वेळ आली आहे, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.
विशेष म्हणजे, ही टीका विरोधकांकडून नव्हे तर सरकारमधील घटक पक्षाच्या नेत्याकडून करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातून जनावरे खरेदी करून सांगोल्याकडे निघालेल्या शेतकऱ्यांना पंढरपुरात काही तथाकथित गोरक्षकांनी अडवून मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर जनावरे जप्त करण्यात आली, तर पोलिसांनी कोणतीही सखोल चौकशी न करता शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच सदाभाऊ खोत रात्री उशिरा पंढरपुरात दाखल झाले आणि त्यांनी पोलिस प्रशासनाला धारेवर धरले. “शेतकऱ्यांनी गांजा, अफू किंवा चरस पिकवायचा नाही, आता दूध व्यवसायही करायचा नाही, मग शेतकऱ्यांनी जगायचं कसं?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
हेही वाचा : Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरांगे आंदोलन मागे घेणार? राधाकृष्ण विखे पाटील यांचं मोठं वक्तव्य
गोवंश कायद्यावरून सरकारवर निशाणा साधताना खोत म्हणाले की, राज्यातील सर्व शेतकरी नेते या कायद्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत सातत्याने आवाज उठवत आहेत. तरीही सरकारला शेतकऱ्यांची वेदना समजत नाही. “देवेंद्र फडणवीस अनेक चांगले निर्णय घेतात, पण गोवंश कायद्याबाबत ते इतके कच का खातात?” असा थेट सवालही त्यांनी केला.
राज्यात गोरक्षकांच्या नावाखाली सुरू असलेली गुंडगिरी सरकारने तात्काळ थांबवावी, अन्यथा शेणामुतात हात घालणारा शेतकरी रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवेल, असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला. “सत्तेचा मार्ग आता जातीपातीच्या राजकारणातून नव्हे, तर मातीच्या राजकारणातून जाणार आहे,” असे म्हणत त्यांनी भाजपलाही अप्रत्यक्ष इशारा दिला.
गोरक्षकांच्या कारवायांमुळे गोपालक आणि शेतकरी हैराण झाले असून, आंदोलन करणारे नेतेही हतबल बनल्याची खंत व्यक्त करत खोत यांनी सरकारच्या आश्रयाखाली सुरू असलेली ही गुंडगिरी थांबवण्याची मागणी केली. तसेच हा कायदा रद्द करण्याची मागणी करत आता पांडुरंगाकडे जाऊन सरकारला सद्बुद्धी देण्याची प्रार्थना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Muskmelon Seeds: छोट्या बिया, मोठे फायदे; महिलांनी आहारात नक्की करा ‘या’ बियांचा समावेश





