Devendra Fadnavis : दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है! देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला

नागपूर : मत चोरीचा आरोप करणारे नेते त्यांच्या पराभवाबद्दल आत्मपरीक्षण करण्याऐवजी निवडणुकीत पराभवासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांना सांत्वन देण्यासाठी असे करत आहेत. मला एका गालिबचा शेर आठवतो. गालिबने म्हटले होते की, ‘दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है…’ मी यावर एवढेच बोलेन, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरे यांना टोला लगाविला.
नागपूर येथे पत्रकारांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोवर सत्य स्वीकारणार नाही, तोवर सर्व पक्षांची अवस्था अशीच राहील. 2014 मध्ये मोदी जिंकले होते, तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मागील 15-15 वर्षांपासून सत्ता होती. त्यामुळे जोवर विरोधक विचार करणार नाही की, आपण का हरतो आहोत? जनतेने आपल्याला का नाकारले आहे? विरोधक या दोन्ही प्रश्नांचा अभ्यास न करता जोवर छाती बडवण्याचा काम करतील, तोवर ते जिंकणार नाहीत. तसेच विरोधक जोपर्यंत लोकांचा अपमान करतील, तोपर्यंत ते निवडून देखील येणार नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकांनी भ्रमित होण्याचे कारण नाही. आमची महायुती अभेद्य आहे. त्यामुळे आम्ही महायुतीमध्येच लढणार आहोत. आम्हाला कोण येऊन भेटतो यावरून युती ठरत नाही किंवा त्यावरून राजकारणही होत नसते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढेल आणि महायुतीच जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरू
लाडकी बहिण योजनेअंतर्गत काही लोकांकडून बेकायदेशीरपणे लाभ घेत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यावर सरकारकडून कारवाई करत असून सुमारे २६ लाखांहून अधिक बोगस लाभार्थ्यांची चौकशी सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या योजनेमुळे २१ ते ६५ वयोगटातील प्रत्येक कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ मिळू शकतो. तथापि, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला किंवा वयोगटाबाहेरील महिलांनी लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात पडताळणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.





