मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शिष्ठीच्या दाव्यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी एका ट्विटद्वारे फडणवीस आणि पवार यांच्या नेतृत्वाखालील शिस्तीच्या अभावावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंबादास दानवे यांच्या मते, घपले, विधिमंडळातील गैरप्रकार, मारामारी आणि बरळपणा यांना आळा घालण्याऐवजी हे दोन नेते केवळ “नाराजी, तीव्र नाराजी आणि अति तीव्र नाराजी” व्यक्त करत आहेत. परंतु ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. या ट्विटने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवली असून, महायुती सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंबादास दानवेंच्या ट्विट काय? अंबादास दानवे यांनी आपल्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पवार यांच्या कारभारावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, “राज्याचे कारभारी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची शिस्त तशी नावालाच उरली आहे वाटते. घपले करून हॉटेल घ्या, विधिमंडळात रम्मी खेळा, बरळा, मारामारी करा, कोणाच्याही नाकावर बुक्का मारा.. काहीही करा! आता हे दोन शिस्तीचे लोक फक्त नाराजी.. तीव्र नाराजी.. अति तीव्र नाराजी व्यक्त करतानाच दिसतात.” या ट्विटद्वारे अंबादास दानवे यांनी महायुती सरकारमधील अनुशासनहीनता आणि गैरप्रकारांना लक्ष्य केले आहे. त्यांनी घोटाळे, विधिमंडळातील गोंधळ आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली.