Dehu Road Murder Case – देहूरोड येथील रमेश रेड्डी खून प्रकरणात अचानक नाट्यमय घडामोड घडली आहे. मुख्य संशयित आफताब समीर शेख स्वतःहून न्यायालयात हजर झाला. पोलिसांकडून एन्काऊंटर होण्याची भीती असल्याचा दावा त्याने केला आहे. २८ एप्रिल रोजी देहूरोड परिसरात रमेश गुरूस्वामी रेड्डी यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेने शहर हादरले होते. तपासात जुन्या वैमनस्याची पार्श्वभूमी समोर आली. रमेश यांच्या भावाच्या खुनाप्रकरणी आफताबच्या कुटुंबीयांवर गुन्हा आहे. त्या प्रकरणातील जामिनाला रमेश यांनी विरोध केला होता. याच कारणातून हत्या झाल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर आफताब फरार होता. पोलीस आणि गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. दरम्यान काही साथीदारांना अटक झाली. त्यानंतर त्याने कायदेशीर हालचाली सुरू केल्या. पुणे न्यायालयात अर्ज दाखल केला. मात्र तो नामंजूर झाला. अखेर त्याने वडगाव मावळ न्यायालयात हजेरी लावली. न्यायालयात दिलेल्या अर्जात त्याने गंभीर आरोप केले. “माझा एन्काऊंटर होऊ शकतो,” अशी भीती व्यक्त केली. न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याला कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणात पोलीस पुढील कारवाईच्या तयारीत आहेत. आरोपीची कोठडी मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. तपासातून आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे.