Indrayani River : इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू; आषाढी वारीच्या तोंडावर प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
Indrayani River : देहूतील ऐतिहासिक इंद्रायणी नदीपात्रात शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत.

Indrayani River : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यू झाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून नदीत मृत मासे आढळत होते, मात्र शनिवारी (दि. १३) शेकडोंच्या संख्येने मासे मृतावस्थेत नदीपात्रात तरंगताना आणि घाटावर वाहून आलेले दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. (Indrayani River)
आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना लाखो वारकरी देहूत दाखल होणार आहेत. इंद्रायणीच्या तीरावरील घाटावर अनेक भाविक आचमन आणि स्नानासाठी येतात. (Indrayani River)
इंद्रायणीला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त आहे. अशा महत्त्वाच्या काळात श्रद्धेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या इंद्रायणी नदीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मासे मृत झाल्याने नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Indrayani River)
नदीपात्रातील अनेक ठिकाणी मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसत असून काही मासे किनाऱ्यावर वाहून आल्याने परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. (Indrayani River)
शनिवारी (दि. १३) सायंकाळी सुमारे पाच वाजल्यापासून आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम हाती घेतले. स्वयंसेवकांनी अनेक तास नदीकाठावर उतरून मृत मासे गोळा केले आणि त्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. (Indrayani River)
नदी परिसर स्वच्छ ठेवण्याबरोबरच दुर्गंधी आणि संभाव्य आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाला हातभार लावत नदी स्वच्छतेसाठी सहकार्य केले. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत इंद्रायणी नदीतील प्रदूषणाचा प्रश्न अनेकदा चर्चेत आला आहे. (Indrayani River)
विविध सामाजिक संस्था, पर्यावरण कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी नदी स्वच्छतेसाठी आवाज उठवला असला तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. परिणामी अशा घटना पुन्हा-पुन्हा घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत. (Indrayani River)





