Manoj Jarange: प्रसाद लाड यांच्या चर्चेनंतरही पेच कायम; मनोज जरांगेचा उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार
Manoj Jarange: आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने बुधवारी रात्री राजकीय हालचालींना वेग आला. आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत दाखल होत जरांगे यांची भेट घेतली. ‘भाऊ’ म्हणून आलो असून, जरांगेंना साथ देण्यासाठी आलो असल्याचे लाड यांनी सांगितले.
जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना आमदार प्रसाद लाड यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. 58 लाख कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्र पडताळणी, दाखल गुन्हे मागे घेणे, मराठा-कुणबी कक्ष, ओबीसींच्या सवलती, सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि नोकरी नियुक्ती अशा विविध मुद्द्यांवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. (Manoj Jarange)
लाड यांच्या माहितीनुसार, 58 लाख कुणबी नोंदी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लावण्यात येणार असून, संबंधित नोंद आढळणाऱ्या अर्जदारांना जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार असून, या संपूर्ण प्रक्रियेचे मॉनिटरिंग आपण स्वतः करणार असल्याचे लाड यांनी सांगितले. मराठवाड्यात जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू करण्याबाबतही उद्यापर्यंत कार्यवाही होईल, असे आश्वासन लाड यांनी दिले. (Manoj Jarange)
सातारा-कोल्हापूर गॅझेटवर जरांगे ठाम
मात्र, सरकारकडून देण्यात आलेल्या आश्वासनांवर मनोज जरांगे यांनी पूर्ण समाधान व्यक्त केले नाही. सातारा आणि कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटचा जीआर काढल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘जीआरशिवाय उपोषण थांबवणार नाही,’ अशी भूमिका घेत जरांगेंनी सरकारला थेट आव्हान दिले.
या गॅझेटचा जीआर काढून तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतही जरांगेंनी सरकारला सवाल केला. जालना जिल्हाधिकाऱ्यांकडे हैदराबाद गॅझेटनुसार प्रलंबित असलेली सहा प्रमाणपत्रांची प्रकरणे मार्गी लावून दाखवा, त्यानंतरच आपण पाणी पिऊ, अशी अट त्यांनी मांडली.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी (Manoj Jarange)
मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेतले नाहीत, तर संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.
मराठा समाजातील सुमारे 350 तरुणांना PSI पदावर नियुक्ती मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत, त्यांना नियुक्ती देण्याची मागणीही जरांगेंनी केली. तसेच मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींना लागू असलेल्या शैक्षणिक सवलती लागू कराव्यात आणि विद्यार्थ्यांनी भरलेली फी परत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान,आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना पाणी पिण्याची विनंती केली. यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी स्वतःच्या हाताने जरांगे यांना पाणी पाजले. तसेच सलाईन लावून घेतले. मात्र, मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे. दोन दिवसांत काम झाले नाही, तर सलाईन काढून फेकतील, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केले. Manoj Jarange
सरकारसमोर आता सातारा-कोल्हापूर गॅझेटचा पेच (Manoj Jarange)
एकीकडे सरकारकडून विविध मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन दिले जात असताना, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील सातारा-कोल्हापूर संस्थानच्या गॅझेटच्या जीआरवर ठाम आहेत. त्यामुळे अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या पुढील हालचालींकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:






