अहमदाबाद/मुंबई – अरबी समुद्रात तयार झालेले “बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छला धडकण्यास सुरुवात झाली आहे. चक्रीवादळामुळे ताशी 125 किमी वेगाने वारे वाहत आहेत.
वाऱ्याचा वेग ताशी 150 किमी पर्यंत पोहचण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. जोरदार वाऱ्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छच्या अनेक भागात झाडे आणि खांब पडायला सुरुवात झाली आहे.
मध्यरात्रीपर्यंत लॅंडफॉल सुरू राहणार असल्याचे आयएमडीचे म्हणणे आहे. चक्रीवादळामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, आतापर्यंत 94 हजारांहून अधिक लोकांना किनारी भागातून हलविण्यात यश आले आहे.
गुजरातमध्ये 15 जहाजे आणि 7 विमाने तयार ठेवण्यात आली आहेत. एनडीआरएफच्या 27 तुकड्याही तैनात आहेत, अशी माहिती कोस्ट गार्ड क्षेत्र-उत्तर पश्चिमचे महानिरीक्षक ए.के. हरबोला यांनी दिली आहे.
हवामान खात्यानुसार, गुजरात व्यतिरिक्त या वादळाचा प्रभाव इतर 10 राज्यांमध्ये दिसत आहे. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, लक्षद्वीप, केरळ, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय यांचा समावेश आहे. येथील अनेक भागात जोरदार वारे वाहत असून पाऊस पडत आहे.
मुंबईत सहा चौपाटी बंद !
बिपरजॉयचा प्रभाव मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरही दिसण्यास सुरुवात झाला असून मोठ्या लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या चौपाटी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
तसेच या ठिकाणी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान 60 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तर दुपारी 3 ते रात्री 11 वाजेदरम्यान 60 प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात आहेत. नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये, यासाठी प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक आवाहन करणार आहेत.