नवी दिल्ली :– सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणामुळे ग्राहक सेवा सुधारण्यात आणि मजबूत बॅंकिंग निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश यांनी म्हटले आहे.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मंत्र्यांनी सांगितले की, बॅंकांच्या विलीनीकरणाचे उद्दिष्ट सरकारी बॅंकांची कार्यक्षमता वाढावी आणि मजबूत बॅंकिंग सिस्टीम देशात सुरू राहावी हे आहे. या विलिनीकरणातून विलीन झालेल्या बॅंकांच्या ग्राहकांना वाढलेल्या शाखा आणि एटीएममध्ये प्रवेश मिळाला ज्यामधून ते आता बॅंकिंग सेवा घेऊ शकतात. ग्राहकांना आता अधिक सोयीच्या सेवा मिळणार आहेत. विलीनीकरणाने मोठ्या आकाराच्या कर्जाचीही सोय ग्राहकांना उपलब्ध झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Parliament Winter Session : कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील बैठकीत ‘तृणमूल’ आणि ‘आप’ही झाले सहभागी
सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या एकत्रिकरणामुळे बॅंकांच्या व्यवहारावर सकारात्मक परिणाम झाला आहे काय असा प्रश्न मंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील उत्तर दिले.