पुणे : सिंहगड टेक्निकल एज्युकेश सोसायटीचे संचालक मारुती नवले यांच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला अंतरिम अटकपूर्व जामीन मिळाला. पुराव्यामध्ये ढवळाढवळ न करणे, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर गुरुवारी दुपारी 1 ते 4 या वेळेत डेक्कन पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर 20 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सत्र न्यायाधीश आर. जी. देशपांडे यांनी हा आदेश दिला. बऱ्हाटे याने ऍड. तुषार चव्हाण, ऍड. अजिंक्य खैरे, ऍड. विवेक शिंदे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. बऱ्हाटे यांनी गुन्हा केलाला नसून, खोट्या गुन्ह्यात अडकाविण्यासाठी घटना घडल्यानंतर तब्बल 8 वर्षे विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. प्रथमदर्शनी खंडणीच्या कलमानुसार गुन्हा दाखल होत नसल्याचे दिसून येत आहे. ते तपासास सहकार्य करण्यास तयार असल्याचा युक्तीवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला. 2011 मध्ये चैनसुख गांधी यांनी नवले यांच्याविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात मुळशीतील अंबडवेट येथील पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टची 11 एकर जागेची बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावल्याची तक्रार दिली होती. त्यावेळी गांधी यांनी बऱ्हाटे याच्या सांगण्यावरून ही फिर्याद दिली. बऱ्हाटे याप्रकरणाचा पाठपुरावा करत होता. त्याने आणि त्याच्या साथीदाराने सप्टेंबर 2012 रोजी 20 लाख आणि 20 लाखांची सोन्याची बिस्किटे घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.