Telangana Local Election: तेलंगणात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने ऐतिहासिक विजय नोंदवला असून भाजप आणि भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या विनंतीवरून बॅलेट पेपरवर घेण्यात आलेल्या या निवडणुकीत ११६ पैकी ७० नगर परिषदांमध्ये काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर सातपैकी चार महानगरपालिकांवरही पक्षाचा झेंडा फडकला आहे. या निकालाला मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची ‘मिनी जनमत चाचणी’ मानले जात असून, शहरी मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे. २,९९५ पैकी १,५३७ जागांवर काँग्रेसचा विजय – राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नगर परिषदांच्या २,९९५ प्रभागांपैकी काँग्रेसने १,५३७ जागांवर निर्णायक विजय मिळवला आहे. त्यापाठोपाठ माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने ७८१ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले आहे. भारतीय जनता पक्षाला केवळ ३३६ जागांवर समाधान मानावे लागले असून, असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमला ७० आणि सीपीआयला १३ जागा मिळाल्या आहेत. उर्वरित १८३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. हेही वाचा – भारतासोबतचे संबंध कसे असतील? बांगलादेशच्या भावी पंतप्रधानांचे एकाच वाक्यात खळबळजनक उत्तर विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष – डिसेंबर २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या मतदानासाठी काँग्रेसने ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याची आग्रही मागणी केली होती. प्रचारादरम्यान काँग्रेसने आपल्या कल्याणकारी योजनांचा पाढा वाचला, तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री केसीआर यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. या विजयानंतर हैदराबादमधील गांधी भवन परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला असून, जनतेने रेवंत रेड्डींच्या विकासकामांवर शिक्कामोर्तब केल्याची भावना प्रदेशाध्यक्ष महेश कुमार गौंड यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसवर ध्रुवीकरणाचा आरोप – दुसरीकडे, या निकालाने भाजप आणि बीआरएसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. बीआरएसचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी आपला पक्षच राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असल्याचा दावा केला असून, अनेक जागांवर निसटता पराभव झाल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपाने या निकालावर नाराजी व्यक्त केली आहे. प्रदेशाध्यक्ष रामचंद्र राव यांनी सत्ताधारी काँग्रेसवर मतदारांच्या ध्रुवीकरणाचा आरोप केला असून एमआयएम आणि डाव्या पक्षांनी भाजपाला रोखण्यासाठी छुपी युती केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, करीमनगर आणि निजामाबादमध्ये भाजपाला काही प्रमाणात यश मिळाले असून, करीमनगरमध्ये पहिल्यांदाच भाजपाचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. नगरपालिकांमधील या विजयानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांचे लक्ष वर्षाअखेरीस होणाऱ्या ग्रेटर हैदराबाद, मलकाजगिरी आणि सायराबाद या ३०० प्रभागांच्या महापालिका निवडणुकांकडे लागले आहे. या मेगा निवडणुकांमध्येही सत्ताधारी काँग्रेसच बाजी मारेल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.