UP by-elections: यूपीमध्ये पोटनिवडणूक न लढवण्याचा काँग्रेसचा निर्णय, अखिलेश यादव यांच्या ‘सपा’ला पाठिंबा जाहीर

लखनऊ (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील आगामी पोटनिवडणुकांमध्ये काँग्रेसने आपल्या उमेदवारांना उतरवणार नसल्याची घोषणा आज केली आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. काँग्रेसने सपाला (समाजवादी पक्ष) पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ( up assembly by-elections 2024)
समाजवादी पक्षाला पाठिंबा, काँग्रेसचा निर्णय
लखनौमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अविनाश पांडे म्हणाले, “उत्तर प्रदेशातील आगामी पोटनिवडणुकांसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांना निवडणुकीत उतरवणार नाही आणि समाजवादी पक्षाला पाठिंबा देणार आहे.” त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेचा भाग असून, काँग्रेस अध्यक्षांच्या संमतीने घेतला आहे.
भाजपला पराभूत करण्यासाठी ‘इंडिया’ आघाडी एकत्र
अविनाश पांडे यांनी भाजपवर टीका करत म्हटलं, “गेल्या १० वर्षांपासून भाजपने संविधान दुर्बल करण्याचे प्रयत्न केले आहेत आणि समाजात फूट पाडून आपले राजकीय हित साधले आहेत. पण लोकांनी लोकसभा निवडणुकीत त्यांना सडेतोड उत्तर दिले.”
काँग्रेसने “संविधान बचाव संकल्प” बैठका घेतल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. “आज जर भाजपला थांबवलं नाही तर संविधान आणि सामाजिक ऐक्य धोक्यात येईल,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सपाच्या ‘सायकल’ चिन्हावर उमेदवार
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही सपाच्या ‘सायकल’ चिन्हावर इंडिया आघाडीचे उमेदवार उतरवले जातील, असे सांगितले. त्यांनी म्हटलं, “आम्ही संविधान, आरक्षण, आणि सामाजिक ऐक्य वाचवण्याचा निर्धार केला आहे. बापू, बाबासाहेब आणि लोहियांच्या स्वप्नातील देश बनवण्यासाठी एकत्र आलो आहोत.”
‘आघाडीचं लक्ष्य – भाजपचा पराभव’
काँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी देखील स्पष्ट केलं की, इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश भाजपला पराभूत करणं आहे. “आमच्यासाठी चिन्ह महत्त्वाचं नाही. भाजपच्या कुशासनाचा अंत महत्त्वाचा आहे. आम्ही सर्व ९ जागांवर एकत्रितपणे लढणार आहोत,” असे ते म्हणाले.
९ जागांवर होणार निवडणूक
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुका ९ विधानसभा जागांवर होणार असून, मीरापूर, कुंदारकी, गाझियाबाद, खैर, करहल, फुलपूर आणि कटेहरी या जागांचा समावेश आहे. १३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. 25 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.





