Maharashtra Election : काँग्रेसने नाना पटोलेंना बाजूला सारत बाळासाहेब थोरातांकडे सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यादरम्यान महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये होत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाची चर्चा अक्षरशः ठप्प झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये विदर्भातील जागांवरून सातत्याने एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत असल्याने जागावाटपाची चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही.
यादरम्यान काँग्रेसने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. जागावाटपामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बाजूला करून आता समन्वयाची जबाबदारी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात आली आहे. बाळासाहेब थोरात उद्याच मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. बाळासाहेब थोरात यांच्याकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चेची जबाबदारी देण्यात आली आहे.
विदर्भामधील जागांवरून वाद टोकाला
विदर्भामधील जागांवर ठाकरे गट अडून बसल्याने काँग्रेस आणि ठाकरेंमधील वाद टोकाला गेला आहे. विदर्भात ठाकरे गटाकडून 14 जागांची मागणी करण्यात आली आहे, पण काँग्रेस त्या सोडण्यास तयार नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये वाद सुरु आहे.





