Mallikarjun Kharge : काँग्रेसचे अध्यक्षांनी भाजपाला केले लक्ष्य ; पंतप्रधानांवर केली बोचरी टीका, म्हणाले मणिपूर सतत धगधगत असण्याचे कारण…….

नवी दिल्लीः मणिपूर राज्यात मोठा हिंसाचार उफाळून आला होता. या हिंसाचारातून निंदनीय घटना देशाने पाहिल्या आहेत. मणिपूरची स्थिती बिकट बनली आहे. आताही तिथे अशा प्रकारच्या घटना घडताना दिसत आहे. यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला लक्ष्य करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. मणिपूर सतत धगधगते राहण्यात भाजपचे हितसंबंध गुंतलेले आहेत, असा घणाघाती आरोप खरगे यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून केला आहे. मोदी राजधर्माचे पालन करत नसून या राज्यात घटनात्मक दोषातून त्यांची सुटका होऊ शकत नाही, असे देखील त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
२०२२ मध्ये तुमची मणिपूरची शेवटची भेट भाजपसाठी मते मागण्यासाठी होती. ३ मे २०२३ रोजी राज्यात हिंसाचार उसळला होता. या हिंसाचाराच्या घटनेत ६०० हून अधिक दिवस उलटून गेले आहेत आणि उपग्रह प्रतिमांद्वारे प्रसारमाध्यमांच्या वृत्तांतून आता राज्यात गावे नाहीशी होत चालल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कांगपोकपी जिल्ह्यात जमावाने पोलीस अधीक्षकांवर हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. सुप्रीम कोर्टाने देखील यावर चिंता केली असून या राज्यात शांतता राखणे आणि सामान्यता सुनिश्चित करणे ही केंद्र आणि राज्य सरकारांची प्राथमिक जबाबदारी आहे, असे म्हटले आहे.
राज्यपालांकडून सुरेक्षेचा आढावा
मणिपूर राज्यात हिंचासाराच्या अनेक घटना याअगोदर घडलेल्या आहेत. आताही काही ना काही अशा प्रकारच्या घडतच आहेत. यामुळे मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), आसाम रायफल्स यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत सुरक्षेचा आढावा घेतला. या बैठकीला सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग, पोलीस महासंचालक राजीव सिंग, आयजीएआर (दक्षिण) मेजर जनरल रावरूप सिंग आणि सीआरपीएफ, बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





