नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी मोदी आडनावाच्या व्यक्ती चोर असतात असे विधान करून सर्व ओबीसी समाजाचा अपमान केला आहे असा जो आरोप भाजप अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांनी केला आहे. त्यावर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अशा विधानांद्वारे भाजपचे नेते आता जातीचे राजकारण करू लागले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
ओबीसी समुदायांची चोरांशी तुलना करून, राहुल गांधींनी एक दयनीय आणि जातीयवादी मानसिकता दर्शविली आहे. तथापि, त्यांची नवी टीका आश्चर्यकारक नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या राजकीय भाषेची पातळी नेहमीच खालची राहिली आहे, असेही नढ्ढा यांनी म्हटले होते.
त्यावर आपली प्रतिक्रिया देताना खर्गे यांनी हिंदीतील ट्विट संदेशात म्हटले आहे की, प्रचलित वादावर कोणतेही फाटे फोडण्याचा प्रयत्न सरकारने केला तरी मोदी सरकार जेपीसी चौकशीच्या मागणीपासून पळून जाऊ शकत नाहीत! नीरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी हे आरोपी पीएनबी आणि जनतेचे पैसे घेऊन पळून गेले. पण सर्वच ओबीसींनी तसे केले नाही, मग तो ओबीसींचा अवमान कसा, असा सवालही खर्गे यांनी केला आहे.
Rahul Gandhi disqualified : गरज पडली तर लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ – मल्लिकार्जुन खर्गे
मोदींना उद्देशून त्यांनी म्हटले आहे की, तुमच्या ‘बेस्ट फ्रेंड’मुळे एसबीआय आणि एलआयसीचे नुकसान झाले आहे. प्रथम चोरांना मदत आणि नंतर जातीचे राजकारण हा प्रकार लज्जास्पद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.