‘जर बॉम्ब पडला असता तर आम्हाला कळले नसते का?’ ; काँग्रेस नेते चरणजीत चन्नी यांनी मागितले सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे

Congress on Surgical Strike । जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वांच्या नजरा सरकारच्या कारवाईकडे लागल्या आहेत. दरम्यान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी २०१६ मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकबद्दल केंद्र सरकारकडून पुरावे मागितले. काँग्रेस कार्यकारिणी (सीडब्ल्यूसी) बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी सरकारच्या कारवाईवर शंका घेत “जर आपल्या देशात बॉम्ब पडला तर आपल्याला त्याची माहिती होणार नाही का? ते म्हणतात की आम्ही पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, पण काहीही झाले नाही. सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, कोणालाही त्याची माहिती मिळाली नाही.” असे म्हणत पुरावे सादर करण्याची मागणी केली.
काँग्रेस खासदार चरणजीत सिंह चन्नी यांनी,”मी नेहमीच सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आलो आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सरकारच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आज देशातील लोकांच्या जखमा भरून काढण्याची गरज आहे. संपूर्ण देश पाकिस्तानला कधी उत्तर देईल याची वाट पाहत आहे. आता १० दिवस झाले आहेत, सरकार काय करत आहे? चरणजीत सिंह चन्नी यांच्या विधानावरून देशात पुन्हा एकदा राजकारण तापले आहे.
काँग्रेस थेट पाकिस्तानकडून आदेश घेते : भाजप Congress on Surgical Strike ।
चरणजित सिंह चन्नी यांच्या विधानानंतर भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “राहुल गांधींची काँग्रेस पाकिस्तानी दहशतवादाचे समर्थन करत आहे. आता चरणजित सिंह चन्नी आपल्या सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या महत्त्वाच्या वेळी काँग्रेस आपल्या सैन्याचे मनोधैर्य का खच्ची करत आहे? काँग्रेस थेट पाकिस्तानकडून आदेश घेत आहे.” असे म्हणत त्यांच्यावर पलटवार केला आहे.
‘लष्कर-ए-तैयबासारख्या गटांना काँग्रेस पुरस्कार देते’ Congress on Surgical Strike ।
शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नेत्या शायना एनसी यांनी त्यांच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाल्या, “काँग्रेसने यावेळी देशासोबत उभे राहिले पाहिजे पण ते राजकारण करत आहेत. काँग्रेस लष्कर-ए-तैयबासारख्या गटांना पुरस्कार देते. ही देशविरोधी मानसिकता काँग्रेसची आहे हे स्पष्ट आहे. ते भारतासोबत उभे नाहीत, ते फक्त त्यांचे राजकारण करत आहेत.”
भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह नाही – केसी त्यागी
जेडीयू नेते केसी त्यागी यांनी, “जेव्हा बांगलादेशची फाळणी झाली तेव्हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींची तुलना दुर्गाशी केली होती. राष्ट्रीय हिताशी संबंधित अशा संवेदनशील मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून काँग्रेस पक्ष देशाला, पाकिस्तानला आणि जगातील इतर देशांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे? तुम्ही पंतप्रधान मोदी, भाजपवर टीका करू शकता, पण देवाच्या फायद्यासाठी, भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका.” असे आवाहन केले आहे.





