Ramesh Chennithala : कॉंग्रेस श्रेष्ठींकडून नव्या प्रदेशाध्यक्षाची चाचपणी ? काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला नागपूरमध्ये दाखल

नागपूर : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. याचे खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडल्या जात आहेत. त्यांच्या विषयी असलेली नाराजी पाहता, नव्या प्रदेशाध्यक्षाच्या नावाची चाचपणी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी नागपूरमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे.
चेन्नीथाला सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास नागपुरमध्ये आले. रात्री आठ वाजता ग्रामीण काँग्रेसच्या कार्यालयात त्यांनी सर्व आजीमाजी आमदार आणि खासदारांची बैठक घेतली. त्यामुळे नाना पटोले यांची गच्छंती अटळ मानल्या जात आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि ४४ आमदार असताना काँग्रेसने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी नाना पटोले यांच्यावर सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत फक्त १६ आमदार जिंकून आले आहेत.
त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यासाठी यापेक्षा मोठा पुरावा आणि दुसऱ्या कारणाची गरज नाही, असे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळवले होते. त्याचे श्रेय नाना पटोले यांनी आपल्याकडे घेतले. आता पराभवाची जबाबदारी त्यांनाच स्वीकारावी लागले, असे यापूर्वी माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहे.
तत्पूर्वी नाना पटोले यांनीसुद्धा प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावे, असे पत्र काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दिले आहे. हिवाळी अधिवेशनाच्यापूर्वी त्यांनी विधानसभेत काँग्रेसचा गटनेता होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र पटोले यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचा यास विरोध आहे. दुसरीकडे पटोले यांचे समर्थकसुद्धा त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी करीत आहेत.
राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होईपर्यंत त्यांना प्रदेशाध्यक्षपदी कायम ठेवावे अशी मागणी केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रमेश चेन्नीथला पक्षश्रेष्ठींना काय अहवाल सादर करतात यावरच पटोले यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.





