गुवाहाटी – वर्ष 1968 पासून कॉंग्रेस सरकारच्या फूट पाडा आणि राज्य करा, या धोरणामुळे ईशान्य प्रदेश गेल्या 70 वर्षांपासून भौगोलिक वेगळेपण, राजकीय अस्थिरता आणि असंतुलित विकास यासारख्या आव्हानांना तोंड देत आहे. मणिपूरसारख्या ईशान्येकडील राज्यांमधील अशांततेला कॉंग्रेस जबाबदार असून, या हिंसाचाराचे खापर भाजपावर फोडणे सर्वस्वी गैरलागू आहे.
या हिंसाचाराचा जाब विचारायचा असेल, तर तो कॉंग्रेसलाच विचारला पाहिजे, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. मणिपूरमध्ये मागील काही काळापासून हिंसाचार सुरू आहे. यामध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष केंद्र सरकारला रस्त्यापासून संसदेपर्यंत घेराव घालण्यात व्यस्त आहेत.
गेल्या 70 वर्षांपासून ईशान्येकडील राज्यांत जी विकासकामे झाली नाहीत, ती केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात झाली आहेत. त्यामुळे या प्रदेशातील अनेक संघर्षांचे निराकरण झाले असल्याचा दावा हिमंता यांनी केला.
सरमा यांनी ट्विट केले की, आसाममधील बोडो, कार्बी संघर्ष असो; मिझोराममधील ब्रुस समस्या असो किंवा त्रिपुरामधील एनएलएफटी बंड असो किंवा नागालॅंडमधील अनेक समस्या माननीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सोडवण्यात आल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘प्रदेशाला जोडणे आणि एकत्र आणण्यावर’ मोठ्या प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. कॉंग्रेसने अशा पद्धतीचे काम कधीच केले नव्हते. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधानांनी 60 वेळा आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी 400 वेळा ईशान्येला भेट दिल्याचे सरमा यांनी लक्षात आणून दिले आहे.