बिहार निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा मोठा निर्णय! MVA मधील मित्रपक्षांनाच धक्का, मुंबईतील बैठकीत थेट घोषणा

Mumbai Municipality : नुकत्याच बिहार विधानसभेच्या निकालाने भाजपला मोठे यश मिळवून दिले असून त्यांचे बळ आता वाढले आहे. भाजपने बिहार विधानसभेची निवडणूक मुख्यमंत्री नीतीशकुमार यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार एनडीए म्हणून निवडणूक लढवली गेली. दुसरीकडे महागंठबंधनची निवडणुकीतील निकालाने दाणादाण उडवून दिली. काँग्रेसला बोटांवर मोजण्याइतक्याच म्हणजेच ६ जागा मिळवता आल्या. राजदचे तेजस्वी यादव यांना आपला मतदार संघ राखण्यात यश आले पण इतर ठिकाणी मात्र पक्षाला जोरदार झटका बसला.
आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद पंचायती समितासाठी निवडणुका होतील. त्यानंतर सर्वांत महत्वाच्या अशा महापालिका निवडणुकांचा बार उडणार आहे. अशातच महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने मुंबई महानगर पालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे मुंबईत काँग्रेस स्वबळावर निवडणुकीला सामोरी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. या बैठकीला पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकरे बधूंना धक्का
गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू या निवडणुकीसाठी एकत्रित येणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तसे संकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून वेळोवेळी दिलेले आहेत. दोन्ही भावांच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने भेटी झालेल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू राजकीयदृष्ट्या एकत्र येणार असल्याचे ठरत असतानाच काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने हा निर्णय ठाकरे बंधूंसाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाकरे बंधू काय भूमिका घेणार?
पहिल्यापासूनच काँग्रेसने मनसेला एकत्र येण्यास विरोध दर्शविलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वीच मनसेला सोबत घेण्यास विरोध केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा दिल्याचे सांगितले जात आहे. आता यावर मनसे आणि ठाकरे गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





