Abhijeet Dipke : “आता कानाखाली खावी लागेल..”; अभिजीत दीपकेला कोणाची भीती आहे? स्वतः सांगितलं…
माध्यमांशी बोलताना अभिजीतला, "घरी आल्यावर नेहमीच काहीतरी खास असतं. तुमचे आई-वडील म्हणत आहेत की आता आमचा मुलगा बराच काळ घरी राहील.

Abhijeet Dipke | Cockroach Janata Party : नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात गाजलेल्या आंदोलनामुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेला कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रथमच महाराष्ट्रात दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली.
ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात अभिजीतचं स्वागत करण्यात आलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्याने आंदोलनानंतरच्या आयुष्याबाबत, आई-वडिलांच्या प्रतिक्रियेबाबत आणि व्हायरल झालेल्या पार्टीच्या व्हिडिओवरही स्पष्ट भूमिका मांडली. (Abhijeet Dipke)
स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना अभिजीतला, “घरी आल्यावर नेहमीच काहीतरी खास असतं. तुमचे आई-वडील म्हणत आहेत की आता आमचा मुलगा बराच काळ घरी राहील.
यावर काय सांगाल?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हसत अभिजीत म्हणाला, “थांबायची इच्छा तर आहे, पण जास्त वेळ घरी थांबता येणार नाही. अजून खूप काम बाकी आहे.”
यानंतर एका पत्रकाराने, “तुमचे आई-वडील म्हणाले की अभिजीत आता आमचा गुरु झाला आहे. आंदोलनानंतरचा हा क्षण तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे?” असा प्रश्न विचारला.
त्यावर मिश्कील अंदाजात उत्तर देताना अभिजीत म्हणाला, “हा क्षण काही फार महत्त्वाचा नाही. मी घरात गेल्यावर मला चापटा पडतील. आई-वडिलांना थोडंफार घाबरावंच लागणार.” त्याच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. (Abhijeet Dipke)
दरम्यान, आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दीपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आनंद साजरा करत पार्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून टीकाही करण्यात आली होती. (Abhijeet Dipke)
त्याबाबत विचारले असता अभिजीतने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. “आम्ही सलग ३६ दिवस संघर्ष केला. त्यानंतर एक दिवस आनंद साजरा केला, तर त्यात गैर काय? आम्ही कोणाचाही रस्ता अडवला नाही, कोणाला त्रास दिला नाही किंवा रस्त्यावर माजही दाखवला नाही,” असे तो म्हणाला.
अभिजीत दीपके परदेशात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय झाला. त्यानंतर त्याने कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू केलेल्या आंदोलनाला देशभरातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
अनेक दिवस सुरू राहिलेल्या या आंदोलनामुळे नीट परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली.
या आंदोलनानंतर अभिजीत दीपकेची ओळख केवळ एका संघटनेच्या संस्थापकापुरती मर्यादित राहिली नाही, तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडणारा युवा नेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ लागले.






