‘भाजप’मधील दोन सुरांची ‘इनसाइड स्टोरी’: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले ’80-20′ तर नितीन गडकरी म्हणाले, जातीबद्दल बोललात तर ‘मारेन लाथ…’

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार ‘सबका साथ-सबका विकास’च्या गोष्टी करत असतात. खुद्द पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा याचा उल्लेख केला आहे. भाजपच्या नेतृत्वानेही हा संदेश सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, गेल्या दोन दिवसांत भाजपच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रकारची वक्तव्ये केली, त्यावरून पक्षात वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत होते. सर्वप्रथम, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलायच झाले तर त्यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकांबाबत आपली योजना स्पष्ट केली. 2027 ची लढत 80 विरुद्ध 20 अशी होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
योगी आदित्यनाथ यांनी 80-20 चा नारा दिला तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीच्या मुद्द्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले की, जो कोणी जातीबद्दल बोलेल, त्याला लाथ मारली जाईल. गडकरींनी अनेकदा पक्षाच्या पलीकडे जाऊन वक्तव्ये केली आहेत. अशा स्थितीत त्यांनी नुकत्याच केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
गडकरी काय म्हणाले ज्यामुळे वादाला तोंड फुटले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमात जातीपातीच्या राजकारणावर जोरदार टीका केली. जात, धर्म, भाषा, लिंग या आधारावर कोणत्याही व्यक्तीशी भेदभाव करू नये, असे ते म्हणाले. जातीबद्दल बोलणाऱ्याला मी लाथ मारेन, असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही व्यक्ती जात, धर्म, भाषा किंवा पंथामुळे महान होत नाही, तर तो त्याच्या गुणांमुळे महान बनतो. त्यामुळे आम्ही कोणाशीही जात, धर्म, लिंग किंवा भाषेच्या आधारावर भेदभाव करत नाही.
गडकरी असेही म्हणाले की, मी राजकारणात आहे, अनेक गोष्टी घडतात पण मी माझ्या मार्गावर चालतो . जर कोणाला मला मत द्यायचे असेल तर तो करू शकतो आणि जर कोणाला मत द्यायचे नसेल तर त्याने करू नये. तो त्याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. माझे मित्र मला विचारतात की तू असे का बोललास किंवा असा पवित्रा का घेतला. मी त्यांना सांगतो की, निवडणूक हरली म्हणून कोणीही संपत नाही.
मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही – गडकरी
गडकरी पुढे म्हणाले की, मी माझ्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही आणि वैयक्तिक आयुष्यात त्यांचे पालन करत राहीन. समाज आणि देशाच्या विकासासाठी शिक्षणाचे महत्त्वही गडकरींनी सांगितले. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी मी आमदार असताना मुस्लिम समाजातील लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका मुस्लिम शैक्षणिक संस्थेला अभियांत्रिकी महाविद्यालय मिळण्यासाठी मदत केली होती. ते पुढे म्हणाले की, ज्या वर्गाला शिक्षणाची सर्वाधिक गरज आहे तो म्हणजे मुस्लिम समाज आहे.
पक्षाच्या पलीकडे जाऊन भाष्य करतात गडकरी –
नितीन गडकरी यांनी ज्या पद्धतीने आपले मत मांडले ते विचार करायला लावणारे आहे. मात्र, ही काही पहिलीच वेळ नाही. गडकरी यांनी अनेकदा पक्षाच्या पलीकडे जाऊन भाष्य केले आहे. त्यामुळेच भाजपच्या या दिग्गज नेत्याचे विरोधी पक्षांकडूनही कौतुक होत असते. काँग्रेस असो वा समाजवादी पक्ष किंवा इतर पक्ष, त्यांचे नेते गडकरींचे गुणगान करताना पाहिले गेले आहे. गडकरी ज्या पद्धतीने मुस्लिमांबद्दल बोलले त्यामुळे भाजपमध्ये संभ्रम निर्माण झाला असावा. काँग्रेस, शिवसेना, यूबीटी उघडपणे त्यांच्या समर्थनात उतरले आहेत.
योगींनी 80-20 फॉर्म्युल्याबद्दल काय सांगितले –
भाजपचे दिग्गज नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी 80-20 फॉर्म्युल्याचा उल्लेख केला आहे. 2027 मध्ये यूपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन वर्षांनी असल्या तरी मुख्यमंत्री योगींनी तयारी तीव्र केली आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा देत पक्ष आपली बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सीएम योगींनी आता 80-20 च्या राजकारणावर भर दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्टपणे सांगितले की, 2027 मध्ये 80 विरुद्ध 20 अशी लढत होणार आहे. 2022 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री योगी असाच दावा करताना दिसले. त्यांच्या या ताज्या हालचालीमुळे आता राजकीय तापमान वाढू लागले आहे.
एकाच पक्षात दोन भिन्न मते का?
भाजपमधील बड्या नेत्यांची मते वेगळी का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जात, धर्म, भाषा, लिंग यांच्या आधारे भेदभाव करू नये असे गडकरी सांगत असताना योगी आदित्यनाथ 80-20 चा फॉर्म्युला देत आहेत. हे घडण्यामागे एक कारण आहे. नितीन गडकरी हे पक्षातील सौम्य चेहऱ्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक विभागाला सोबत घेऊन चालण्याबाबत ते नेहमीच बोलत आले आहेत. तर योगी आदित्यनाथ कट्टर हिंदुत्वाचा मार्ग अवलंबत आहेत. त्यांची विधाने बघितली तर समजू शकतो की, ते अशा प्रकरणांवर किती निखळ प्रतिक्रिया देत आहेत.





