Weather Update : राज्यात पाच दिवस ढगाळ वातावरण; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

मुंबई : देशातील अनेक राज्ये सध्या तीव्र उष्णतेच्या विळख्यात आहेत. ओडिशातील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. तर गुजरातमध्येही उष्णतेची लाट आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याने (आयएमडी) अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा जारी केला आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान गुजरातच्या विविध भागात ४५-५० किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने वारे आणि जोरदार वादळांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, कारण यावेळी शेतातील पिकांचे पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान होऊ शकते.
गेल्या ३ दिवसांपासून राज्यातील बहुतेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. येत्या २-३ दिवसांत राज्यातील बहुतेक ठिकाणी पाऊस (अवकाळी पाऊस) पडण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे, नाशिक, अहिल्या नगर, जळगाव, सातारा या ठीकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला. तर नाशिक, जळगाव, नाशिक घाटमाथा, पुणे, कोल्हापूर, घाटमाथा, सातारा, सांगली येथे काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला.





