नगर | निवडणूका आल्यानंतर इच्छुकांची चमकोगिरी आमदार मोनिका राजळे यांचा विरोधकांना टोला

शेवगाव – निवडणुका आल्याने सर्वच इच्छुक बाहेर पडले आहेत. गेल्या दहा वर्षात आपल्याकडे कोणीच फिरकले नाहीत. आता मात्र सत्कार, गाण्यांचा कार्यक्रम, दशक्रिया एवढेच नव्हे तर वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापायला लागले आहेत, अशा शब्दांत आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांचा समाचार घेताना राजकारण आणि समाजकारण दिशाहीन बनल्याची खंत व्यक्त केली .
तालुक्यातील राक्षी, माळेगाव ने, घोटण, एरंडगाव समसुद,जुने दहिफळ, तळणी, ताजनापूर येथे रस्ते, सभामंडप व समाज मंदिर अशा ५ कोटी ५ लक्ष लाख रुपये कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या .
आ. राजळे पुढे म्हणाल्या, आमदारांनी दहा वर्षात काय केले अशी टीका केली जाते, मात्र ते दहा वर्ष घराबाहेर पडलेच नाहीत, त्यामुळे कुठे किती विकास झाला हे त्यांना माहित नाही. गाव, वाडी, वस्ती त्यांना ओळखता येईना.आज ते ज्या गावात ज्या रस्त्याने जातात तो भाजपा शासनाने केला आहे, ही सांगण्याची वेळ आली आहे.
तालुक्यातील पुर्नवसित गावांसाठी गेल्या दहा वर्षात साडेसात कोटी रुपयांचा निधी आला. आता २५ कोटींचा प्रस्ताव असून, त्यास दहा दिवसांत निधीची तरतूद होत आहे. त्याचबरोबर हॅम योजनेत तिसगाव- पैठण रस्त्यास सव्वा दोनशे कोटी रुपये मंजूर झाले असून आता फक्त वर्क ऑर्डर होणे बाकी आहे. आपण दहा वर्षात दोन्ही तालुक्यात एकही गाव अथवा वाडी वस्ती विकासापासून वंचित ठेवले नाही. शासनाकडून जे मिळेल ते प्रत्येक गावास देण्याचा प्रयत्न केला आहे . मतदारसंघाचा सर्वोतोपरी विकास होण्याच्या दृष्टीने येणाऱ्या काळात आपण आशीर्वाद द्यावा, अशी विनंती आ. राजळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले, बापूसाहेब पाटेकर, बापू धनवडे, भिमराज सागडे, सागर फडके, महेश फलके, गणेश रांधवणे, कैलास सोनवणे, केशव आंधळे, संजय खेडकर, डॉ. नीरज लांडे, राम गोरे, लक्ष्मण टाकळकर, बालयोगी महाराज, पिरमहंमद शेख, गोरख गाडेकर, काका आव्हाड, नवनाथ आमृत, रामहरी घुले, भक्तराज कातकडे, गोकुळ व्यवहारे, राजेंद्र शेख, हरिभाऊ झुंबड, हनुमान कर्डिले, कल्याण शेळके, भोसले मेजर, बाबासाहेब धस, उमेश धस, अरूण धस, सोमनाथ आघाट, प्रकाश मगर, अशोक गर्जे, दत्तु कांबळे, रमेश डाके, उपअभियंता प्रल्हाद पाठक आदी उपस्थित होते.
.





