प्रभात वृत्तसेवा नारायणडोहो – नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील गोरख रखमाजी खेमनर (वय ३५) या तरुण शेतकऱ्याने कर्जाच्या तणावामुळे विष पिऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली.अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या ३ एकर शेतातील सोयाबीन, कपाशी इत्यादी पिके भुईसपाट झाली होती. शेतातून उत्पन्नाचा मार्ग बंद झाला, त्यानंतर त्यांना मानसिक त्रास सुरू झाला. शेतकऱ्यांना शासनाची मदत वेळेत न मिळाल्याने त्यांचा व्यवस्थेवरील विश्वास उडाला. मागील काळात वैद्यकीय उपचारासाठी त्यांच्यावर जवळपास १० लाखाचे कर्ज झाले होते, तसेच इतर कर्ज असे जवळपास त्यांच्यावर २० लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी वाजता विष घेतले. त्यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना पहाटे त्यांचा मृत्यू झाला. मयत खेमनर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे.