नवी दिल्ली – महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील असून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. शनिवारी (९ जुलै) दुपारी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेणार आहेत.
दरम्यान, दिल्ली दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मध्यावधी निवडणुकांच्या आव्हानाबाबत विचारण्यात आले. “राज्यघटनेप्रमाणेच निवडणुका होतील, शिवसेना-भाजप युतीचं हे मजबूत सरकार आहे. एकीकडे 164 आमदारांचे मजबूत सरकार आणि समोर 99 आहेत. 164 बहुमताचं हे सरकार आहे. त्यामुळे, लोकांनी त्यांची कामे आणि समस्या घेऊन आमच्याकडे यावे. आम्ही लोकांच्या हिताची काम करण्यासाठीच हे सरकार स्थापन केलं आहे, ते आम्ही करत राहू,” असं उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
उद्धव ठाकरेंचे आव्हान
बंडखोर आमदारांच्या गटाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. आपण म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील बंडखोर गटाने केला आहे. उद्धव ठाकरे शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांना ललकारत, मध्यवढी निवडणुकांचे आव्हान देत आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेकडून १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभेचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे करण्यात आली होती. झिरवाळ यांनी या बंडखोर सेना आमदारांना तसे नोटीस देखील बजावले होते. शिंदे गटाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत अपात्रतेच्या कारवाईवर स्टे आणला होता. सर्वोच्च न्यायालयाने १२ जुलै पर्यंत अपात्रतेची कारवाई करू नये असे आदेश याबाबतची सुनावणी ११ जुलैला होईल असे सांगितले होते.
याबाबत आता ११ जुलै (सोमवारी) सुनावणी होणार असून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाईचे होणार काय याचे उत्तर मिळणार आहे. अपात्रतेची कारवाई झाल्यास हा शिंदे गटाला मोठा धक्का असेल. याउलट कारवाई न झाल्यास शिंदे गट हाच शिवसेनेचा अधिकृत विधीमंडळ पक्ष म्हणून गणला जाईल असे जाणकार सांगतात.