Manoj Jarange : छगन भुजबळांना तात्पुरतं नादवलं; त्यांना मंत्रिपद देण्याचा फडणवीसांचाच डाव, मनोज जरांगेचा हल्लाबोल

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भुजबळ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे आता छगन भुजबळ यांना कोणत्या खात्याची जबाबदारी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाणार अशी चर्चा होती. अखेर आज ही चर्चा खरी ठरली असून, भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खात्याचे जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही. अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
छगन भुजबळांना तात्पुरतं नादवलं असेल
पुढे बोलताना म्हणाले, अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल. जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे, त्याला मंत्रिपद दिलं जात आहे. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आल्याने छगन भुजबळांना तात्पुरता आनंद दिला असेल. छगन भुजबळांला तात्पुरता नादी लावलं असेल, चॉकलेट दिलं असेल. छगन भुजबळांच्या आनंदावर शंभर टक्के विर्जन पडेल, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.
छगन भुजबळांना मंत्रिपद देण्याचा फडणवीसांचा डाव
मनोज जरांगे म्हणाले, अजित पवार जातीयवादी लोकं पोसण्याच काम करत आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल. छगन भुजबळ जातीयवादी आहे, त्यांना मंत्रिपद देऊ नका असा विरोध अजित पवारांच्या सगळ्या आमदारांनी करायला पाहिजे होता. छगन भुजबळांना मंत्रिपद द्या, हा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असू शकतो, असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला.
मराठ्यांना संपवण्याचा विडा देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे यांनी प्रवाहात आणलं, त्या माणसाला फडणवीसांनी क्रॉस करून टाकलं. काम झालं की वापरून फेकून देणारा माणूस देवेंद्र फडणवीस आहे, असा निशाणाही मनोज जरांगे यांनी साधला.





