पिंपरी – सध्या “करोना’मुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन असल्यामुळे आरोग्य विभागाने ठेकेदारांच्या कामगारांना कामावर बोलाविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाची माहिती घेऊन योग्य ते बदल करण्याच्या सूचना दिल्या जातील, अशी माहिती महापौर माई ढोरे यांनी दिली.
देशात सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू केलेली असतानाही महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्मशानभूमीतील कामे ठेकेदारी तत्त्वावर करण्याच्या विषयाची अंमलबजावणी केली आहे. यासाठी जय भवानी आणि शुभम या ठेकेदारी संस्थांना स्मशाभूमीतील साफसफाई, देखभाल दुरुस्ती, सरक्षा आणि माळीकाम करण्याचा ठेका दिला आहे. या दोन्ही संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी कामावर हजर रहावे असे आदेश दिले आहेत.
याबाबत महापौरांना विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. तसेच स्मशानभूमीशी निगडीत कामे करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी उपलब्ध असताना ठेकेदारांना हे काम का दिले? याबाबत आपण माहिती घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. गर्दी करणे हे अत्यंत धोकादायक असून पालिका चुकीचे पाऊल उचलणार नाही, याबाबत आपण दक्षता बाळगू तसेच हा आदेश का काढला याबाबत माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असेही महापौर म्हणाल्या.
माहिती देण्यास टाळाटाळ
शुभम आणि जय भवानी या ठेकेदारांना कोणत्या स्मशानभूमीसाठी किती कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. कर्मचाऱ्यांनी संख्या, स्मशानभूमींची संख्या, हजेरीचे निकष आणि वेतन याबाबत माहिती उपलब्ध करून देण्याबाबत नकार देण्यात आला.