C.R.Patil : पाकिस्तानमध्ये पाण्याचा थेंबही जाऊ देणार नाही; केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटलांनी दिला इशारा

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला नामोहरम करण्यासाठी भारत ठामपणे पाऊले उचलत आहे. अशात पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या पाण्याचा एक थेंबही जाऊ देणार नाही, असा सणसणीत इशारा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी दिला आहे.
दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामध्ये सिंधू पाणी करार स्थगितीचा समावेश आहे. संबंधित निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत सहभागी झालेल्या पाटील यांनी सोशल मीडियावरून आक्रमक भूमिका मांडली.
मोदी सरकारने पाणी कराराविषयी घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. तो पूर्णपणे न्यायसंगत आणि राष्ट्रहिताचा आहे, असेही त्यांनी म्हटले. दहशतवाद बिल्कूल खपवून घेतला जाणार नसल्याचा ठोस संदेश पाकिस्तानला देण्यासाठी भारताने संबंधित निर्णय घेतले. त्या निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन योजना आखण्याच्या उद्देशातून सरकार प्रयत्नशील असल्याचे समजते. पाणी कराराला स्थगिती दिल्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसू शकतो. पाकिस्तानचे कृषी क्षेत्र, वीज निर्मिती आणि एकूणच त्या देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रभावित होऊ शकते, असे मानले जात आहे.





