हिमाचलमध्ये भीषण दुर्घटना: भूस्खलनाच्या तडाख्यात आली बस, 15 प्रवाशांचे मृतदेह बाहेर, दोन लहान मुली बचावल्या…

Himachal landslide: मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात मंगळवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. बिलासपूर जिल्ह्यातील झंडूता उपमंडळातील बरठी परिसरात भल्लू पुलाजवळ एक खाजगी बस भूस्खलनाच्या तडाख्यात आली. या दुर्घटनेत आतापर्यंत १५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातावेळी बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. मुसळधार पावसानंतर अचानक डोंगरावरून माती आणि मोठमोठे दगड कोसळून बसवर पडले. त्यामुळे बस पूर्णपणे मलब्याखाली दबली. दुर्घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला.
पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिक मिळून रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन लहान मुलींना जिवंत बाहेर काढण्यात यश आले आहे, तर काही प्रवाशांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही ‘संतोषी’ नावाची खाजगी बस मरोतन येथून घुमारवींच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या दुर्घटनेवर गंभीर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी प्रशासनाला बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचे आणि जखमींना तत्काळ उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री म्हणाले, “राज्य सरकार या कठीण प्रसंगी पीडित कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल.” ते सध्या शिमलातून परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहेत.
दरम्यान, तीव्र पावसामुळे आणि अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी बचाव पथके पूर्ण प्रयत्नाने मलब्यात अडकलेल्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.





