Bulldozer Action – ऐन उन्हाळी पर्यटन हंगामाच्या तोंडावर भुशी धरण परिसरात रेल्वे प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईमुळे स्थानिक व्यावसायिकांवर मोठा आघात झाला आहे. मागील ५० ते ६० वर्षांपासून येथे छोट्या-मोठ्या व्यवसायांद्वारे उदरनिर्वाह करणाऱ्या शेकडो कष्टकरी कुटुंबांच्या दुकानांवर गुरुवारी (दि. ९) बुलडोझर फिरवण्यात आला. रेल्वे आणि स्थानिक पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भुशी धरण हे लोणावळा शहरातील प्रमुख पर्यटनस्थळ मानले जाते. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असते. याच काळात स्थानिक व्यावसायिकांना चांगली कमाई होते. मात्र पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच ही कारवाई झाल्याने अनेक कुटुंबांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. चहा, नाश्ता, खेळणी, स्थानिक खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू विकून उपजीविका करणाऱ्या लहान व्यावसायिकांचे संसार यावर अवलंबून आहेत. या कारवाईदरम्यान स्थानिक नगरसेवक धनंजय काळोखे, नगरसेविका सोनाली मराठे आणि प्रियांका कोंडे यांनी आक्रमक भूमिका घेत रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. मोठ्या पोलिस बंदोबस्तासमोर उभे राहत त्यांनी दुकाने वाचवण्याचा प्रयत्न केला. ५०-६० वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या गरीब लोकांवर असा अचानक बुलडोझर चालवणे ही सरळ दादागिरी आहे, अशा तीव्र शब्दांत काळोखे यांनी अधिकाऱ्यांवर टीका केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी असा आरोप केला की, आमदार सुनील शेळके आणि खासदार श्रीरंग बारणे हे वरिष्ठ स्तरावर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत असतानाही रेल्वे प्रशासनाने कोणतीही मुदत न देता कारवाई केली. स्थानिक व्यावसायिकांच्या रोजी-रोटीवर बुलडोजर त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चर्चा सुरू असताना एवढी घाई का केली? असा सवालही स्थानिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, कारवाईची माहिती मिळताच नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, तसेच इतर नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनीही प्रभावित व्यावसायिकांना पाठिंबा दर्शवला. सर्वांनी एकमुखाने या कारवाईचा निषेध करत पुनर्वसनाची मागणी केली. लोकप्रतिनिधी अन् प्रशासनात संघर्ष उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे आगामी काळात लोणावळ्यात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. अशा वेळी भुशी धरण परिसरातील सुविधा आणि स्थानिक व्यवसाय बंद झाल्यास पर्यटनावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरत आहे. सध्या या कारवाईनंतर स्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्षामुळे पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पिढ्यानपिढ्याच्या व्यवसायावर कारवाई का? स्थानिक व्यावसायिकांनीही आपली व्यथा मांडताना सांगितले की, आम्ही इथे पिढ्यानपिढ्या व्यवसाय करतो. पर्यटकांना सेवा देतो, त्यांची सुरक्षितताही पाहतो. अचानक येऊन आमच्या दुकानांवर बुलडोझर चालवला, तर आम्ही कुठे जायचे? अनेकांनी प्रशासनाकडून पर्यायी जागा किंवा पुनर्वसनाची मागणी केली आहे. “जर स्थानिक व्यावसायिकांमुळेच त्रास होत असेल, तर भुशी धरण पर्यटनासाठी बंद करा. पण गरीबांच्या पोटावर लाथ मारणारी कारवाई आम्ही सहन करणार नाही.” – धनंजय काळोखे, नगरसेवक.