Border–Gavaskar Trophy 2024-25 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासाठी रिषभ पंत ठरेल मॅच विनर – मॅथ्यू हेडन

Border–Gavaskar Trophy 2024-25 : – नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या बॉर्डर – गावस्कर चषक कसोटी लढतीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. पाच कसोटीच्या मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मागील बॉर्डर – गावस्कर चषक स्पर्धेत भारताचा यष्टीरक्षक असलेल्या रिषभ पंत ते चमकदार कामगिरी केली होती. या मालिकेत देखील तो सर्वात महत्वाचा खेळाडू असून विजयासाठी भुकेला असल्याचे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने सांगितले.
सिएट्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सीएटी क्रिकेट रेटिंग अवॉर्ड्स’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना हेडन म्हणाला, भारताकाडून खेळताना रिषभ पंतने दमदार कामगिरी केली होती. त्याने मैदानात असताना ज्या प्रकारे कामगिरी बजावली, त्याच्यावर ऑस्ट्रेलियाच्या जनतेने देखील त्याला भरभरून प्रतिसाद दिला. त्यावेळी भारतीय संघाने चांगली कामगिरी करताना मालिका विजय साकारला होता. विराट कोहली, रिषभ पंत यांसारख्या खेळाडूंनी दमदार आणि मोठ्या खेळी उभारलेल्या होत्या. त्यामुळे यावेळी फलंदाजीसाठी ते कशा प्रकारची रणनीती आखातात हे पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे हेडनने सांगितले.
सन २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रिषभ पंतने दमदार ९७ आणि ८९ धावांची खेळी केली होती. मात्र २०२२ मध्ये रिषभ पंतचा जीवघेणा अपघात झाला होता. रिषभने अपघातानंतर पुनरागमन केले आहे. मात्र त्याला अजूनही कसोटी संघात स्थान मिळाले नाही. मात्र मागील दौऱ्यातील त्याचा अनुभव पहाता त्याला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी स्थान मिळण्याची शक्यता आहे.
कोहली नसताना भारताचा विजय
२०२०-२१ च्या मालिकेत भारताने ॲडलेड येथील पहिली कसोटी लढत गमावली होती. त्यानंतर विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला होता. त्यावेळी बुमराह, शमी यांसह तब्बल पाच खेळाडू दुखापतींशी झगडत होते. तरी देखील भारताने मेलबर्न आणि ब्रिस्बेन कसोटी जिंकताना मालिका खिशात टाकली होती. गब्बा येथील खेळपट्टीवर भारताच्या दुसऱ्या फळीतील गोलंदाजांनी दमदार कारागिरी केली आणि भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची क्षमता आहे. त्यामुळे यावेळी देखील ही मालिका चुरशीची होण्याची अपेक्षा असल्याचे हेडनने बोलताना सांगितले.
पॅट कमिन्सची महत्वाची भूमिका
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या पॅट कमिन्सने बॉर्डर – गावस्कर मालिकेपूर्वी दोन महिन्यांचा विश्रांती ब्रेक घेतला आहे. इतर ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांपेक्षा पॅट कमिन्सची नेतृत्वाची शैली वेगळी असल्याचे हेडनने सांगितले. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ही मालिका खेळविण्यात येणार आहे. त्यामुळे या मालिकेत कमिन्सची भूमिका महत्वाची असणार आहे. यापूर्वी देखील कमिन्सने संघाला मोठ्या मालिकेत विजय मिळवून दिले आहेत, त्यामुळे या मालिकेत विजय मिळवून देण्याची मोठी जबाबदारी कमिन्सवर असल्याचे हेडन बोलताना म्हणाला.





