Odisha school book : आठवीच्या शालेय पुस्तकात बॉलीवूड गाणी; अभ्यासात ‘निंबुडा-निंबुडा’ गाण्याचा समावेश केल्याने नवा वाद
Odisha school book : निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

Odisha school book : राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) २०२० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या ओडिशाच्या नवीन शालेय पुस्तकांवरील आणखी एक वाद समोर आला आहे. आता आठवीच्या कला शिक्षणाच्या ‘कृती’ या पुस्तकात बॉलीवूडच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमातील ‘निंबुडा-निंबुडा’ या गाण्याचा समावेश करण्यात आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
‘रिंद पोश माल’ गाण्याच्या बोलांचाही समावेश
आठवीच्या या पुस्तकातील ‘मो संगीत जगत’ या अध्यायात संपूर्ण राजस्थानी लोकगीत ‘निंबुडा-निंबुडा’ चे बोल देण्यात आले आहेत. हे गाणे मूळचे एक पारंपरिक राजस्थानी लोकगीत आहे, ज्याला १९९९ मध्ये आलेल्या ‘हम दिल दे चुके सनम’ या बॉलीवूड चित्रपटामुळे देशभरात मोठी ओळख मिळाली होती.
इतकेच नाही तर, याच अध्यायात ‘रिंद पोश माल’ या गाण्याचे बोलही आहे, ज्याला ‘मिशन काश्मीर’ या बॉलीवूड चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली होती.
सोशल मीडियावर मीम्सचा पूर
पुस्तकात या गाण्यांचा समावेश झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्स व्हायरल होत आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स, विद्यार्थी यांनी, ओडिशाच्या शालेय पुस्तकात राज्यातील ओडिया लोकगीतांना, शास्त्रीय संगीताला प्राधान्य दिले जायला हवे होते, असे मत व्यक्त केले आहे.
नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये आढळल्या १,६७८ चुका
याआधी नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये १,६७८ चुका आढळल्याचे प्रकरण चर्चेत होते. यात व्याकरणाच्या चुका आणि अयोग्य मजकुराचा समावेश होता. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत तयार करण्यात आलेल्या अनेक नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये या त्रुटी आढळून आल्या होत्या. या प्रकरणावरून शिक्षक, पालक आणि विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली होती.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार चौकशी
याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या निर्देशानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सरकारने एससीईआरटीच्या (SCERT) चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. याशिवाय इतर ६ अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
चौकशी समितीने एकूण १४ शिफारसी केल्या आहेत. यामध्ये एससीईआरटीमध्ये ‘मास्टर एराटा रजिस्टर’ (दुरुस्ती नोंदवही) ठेवणे, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत दुरुस्त्या पोहोचवणे आणि पाठ्यपुस्तकांच्या सखोल पुनरावलोकनासाठी एक स्वतंत्र ‘क्वालिटी अॅश्युरन्स सेल’ (गुणवत्ता हमी कक्ष) स्थापन करण्याच्या शिफारसींचा समावेश आहे.
वादानंतर सरकारचा निर्णय
सरकारने असेही ठरवले आहे की, भविष्यात कोणतेही पाठ्यपुस्तक भाषा, चित्रे, अचूकता आणि गुणवत्तेच्या सर्व स्तरांवर पूर्ण मंजुरी मिळाल्यानंतरच छपाईसाठी पाठवले जाईल. आता आठवीच्या पुस्तकात ‘निंबुडा-निंबुडा’ आणि ‘रिंद पोश माल’ सारख्या गाण्यांवरून सुरू झालेल्या नवीन वादामुळे पाठ्यपुस्तकांचा मजकूर आणि गुणवत्तेवरील चर्चा पुन्हा एकदा समोर आली आहे. Odisha school book
हेही वाचा:
Sahil Goyal : केतन अग्रवाल प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्र फिरणार कारण….





