मुंबई : महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्ताधारी महायुतीला निवडणुकीपूर्वीच मोठा फायदा झाला आहे. नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभरात एकूण 68 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी सर्वाधिक 44 उमेदवार भाजपचे, तर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे 22, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे 2 आणि इस्लामिक पार्टीचा 1 उमेदवार आहे. अपक्ष म्हणून एक जागा नमूद केली जात असली तरी मुख्य लाभ महायुतीलाच झाला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सर्वाधिक 21 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले, ज्यात भाजपचे 15 आणि शिंदे सेनेचे 6 उमेदवार आहेत. ठाणे, भिवंडी, पनवेल, जळगाव, धुळे, अहमदनगर आदी महापालिकांमध्येही असाच कल दिसला. या बिनविरोध विजयांमुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. भाजप नेते या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेला आणि पक्षाच्या रणनीतीला देत आहेत. मात्र, विरोधकांनी या बिनविरोध निवडींवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. दबाव, पैशाचे आमिष किंवा केंद्रीय यंत्रणांच्या धमकीच्या जोरावर विरोधी उमेदवारांना माघार घ्यायला भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. विशेषतः ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी थेट आरोप केला की, “देशात आणि राज्यात लोकशाही संपली आहे. विरोधी पक्षांच्या कमकुवत उमेदवारांना निवडून त्यांचे काम करून घेतले जाते.” मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे, “माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही. बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण इतक्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडी होताना पहिल्यांदाच पाहतो आहे.” ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि माजी आमदार राजू पाटील यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेऊन ही माहिती दिली. याच भेटीत राज ठाकरे यांनी बिनविरोध निवडींवरून हे वक्तव्य केले. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात मनसे या प्रकरणी आक्रमक झाली आहे. आगामी प्रचार सभांमध्ये ते कॉल रेकॉर्ड्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीतील स्थानिक नेत्यांनी हे पुरावे राज ठाकरेंकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. याशिवाय, मनसे येत्या सोमवारी बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या जागांबाबत कोर्टात दाद मागणार आहे. तसेच, मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन तक्रार करणार आहेत. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या बिनविरोध निवडींच्या आरोपांवर चौकशीचे आदेश दिले आहेत. विरोधी उमेदवारांना दबाव टाकण्यात आला का, याची तपासणी होणार आहे. मतदानाला अवघे 12 दिवस बाकी असताना (15 जानेवारीला मतदान, 16 जानेवारीला निकाल) हे प्रकरण राज्याच्या राजकारणात याची मोठी चर्चा आहे. हे प्रकरण लोकशाहीच्या दृष्टीने घातक असल्याचे विरोधकांचे मत आहे. मनसे आणि इतर विरोधी पक्ष एकत्र येऊन याचा आवाज उठवत असताना पुढील दिवसांत या मुद्द्यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. राज्यातील बिनविरोध उमेदवार पक्षनिहाय आकडेवारी – भाजप : 44 – शिवसेना (शिंदे गट) : 22 – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 2 – इस्लामिक पार्टी : 1