Blood Shortage : शाळा व महाविद्यालयांच्या परीक्षा, वाढते उष्णतेचे प्रमाण आणि त्यातच रक्तदान शिबिरांच्या आयोजनावर झालेला परिणाम आदी कारणांमुळे बारामती परिसरात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध करून देणे ब्लड बँकांसमोर मोठे आव्हान बनले आहे. रुग्णांचे नातेवाईक चिंतेत असून त्यांना रक्तासाठी धावाधाव करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या कालावधीत रक्तसाठा कमी होण्याची समस्या निर्माण होत असते. यावर्षीही परीक्षा आणि उष्णतेमुळे अनेक नियोजित रक्तदान शिबिरे रद्द किंवा पुढे ढकलण्यात आली आहेत. परिणामी विविध गटांचे रक्त कमी प्रमाणात उपलब्ध असून अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे रुग्ण, थॅलेसेमियाग्रस्त बालके तसेच गंभीर आजारांवरील उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, ब्लड बँकेकडून नागरिकांना स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक संस्था, युवक मंडळे, शैक्षणिक संस्था आणि विविध संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे, असेही आवाहन केले आहे. रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन ब्लड बँकेचे सेक्रेटरी डॉ. महेंद्र दोशी म्हणाले की, “रक्ताची गरज दिवसेंदिवस वाढत असून सध्या उपलब्ध साठा अत्यंत मर्यादित आहे. इच्छुक रक्तदाते आणि रक्तदान शिबिर आयोजकांनी पुढाकार घेऊन समाजहितासाठी सहकार्य करावे. रक्तदान करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी किंवा रक्तदान शिबिर आयोजित करू इच्छिणाऱ्या संस्थांनी ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.