BLO Negligence: “मी जिथे आहे तिथेच या!” बीएलओच्या उलट उत्तराने पाटसकर संतप्त; थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
BLO Negligence: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या "घरोघरी जाऊन नोंदणी करा" या आदेशाला पाटसमध्ये हरताळ; ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची प्रचंड धावपळ.

BLO Negligence – दौंड तालुक्यातील पाटस परिसरात निवडणूक आयोगाच्या एसआयआर अर्थात मतदारांची विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेत बीएलओकडून हलगर्जीपणा होत असल्याची तक्रार नागरिक आणि मतदारांनी जिल्हाधिकारी, दौंडचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे (दि.१६) करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिलेल्या “घरोघरी जाऊन नोंदणी करा” या आदेशालाच काही बीएलओ जुमानत नसल्याचे चित्र आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार बीएलओ यांनी घरोघरी जाऊन मतदारांकडून विहित नमुन्यातील फॉर्म भरून घेणे आणि कागदपत्रांची पडताळणी करणे अपेक्षित आहे. मात्र, पाटस परिसरात काही बीएलओ ग्रामपंचायत कार्यालयात, शाळेत तसेच घरीच बसून मतदारांना बोलावून अर्ज भरून घेत असल्याचे समोर आले आहे. “इथे येऊनच फॉर्म भरा” अशी सक्ती केल्याने मतदारांची धावपळ होत आहे.
अनेक अशिक्षित, रोजंदारीवर काम करणारे नागरिक, ज्येष्ठ मतदार आणि महिला यांना कार्यालयात येणे शक्य होत नसल्याने ते वैतागून परत जात आहेत. यामुळे अनेक मतदार एसआयआर प्रक्रियेपासून वंचित राहतील. त्यांची नावे मतदार यादीतून वगळली जातील, अशी भीती मतदारांनी व्यक्त केली आहे. “आम्ही घरी येऊन नोंदणी करा अशी विनंती केली तर बीएलओ उलट बोलतात. मी जिथे आहे तिथेच या,” असे उत्तर दिले जात असल्याची लेखी तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
कारवाई करणार- प्रांताधिकारी लबडे
दरम्यान, याबाबत एसआयआर नोंदणी घरोघरी जाऊनच केले पाहिजे, अशी मतदारांची मागणी योग्य आहे. यासंदर्भात बीएलओ यांना योग्य त्या सूचना दिल्या असून अंगणवाडी सेविकांना सोबत घेऊन वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या बीएलओ यांना नोटीस बजावून कारवाई केली जाईल, असे दौंड उपविभागीय प्रांतधिकारी रेवणनाथ लबडे यांनी सांगितले.
कामचुकार करणाऱ्यांचे निलंबन करा
कामचुकारपणा आणि शासकीय निवडणूक प्रक्रियेत टाळाटाळ करणाऱ्या संबंधित बीएलओवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी मतदारांकडून होत आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यात लक्ष घालून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी पाटसकरांनी केली आहे. दरम्यान, लोकशाहीमध्ये मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सुरू केलेल्या एसआयआर मोहिमेचा उद्देशच बीएलओच्या या हलगर्जीपणामुळे फोल ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होत आहे.






