‘मोदींच्या फॅन फॉलोइंगच्या आनंदातच भाजप कार्यकर्ते मग्न राहीले..’; राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ओढले ताशेरे

Narendra Modi | Rashtriya Swayamsevak Sangh – केंद्रात जरी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांचे सरकार आले असले तरी यावेळी त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले नाही. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांत पक्षाची कामगिरी घसरली आहे. २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकणारा पक्ष यावेळी २४० जागांवरच अडखळला. भाजपच्या या कामगिरीवर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ताशेरे ओढले आहेत.
भाजपच्या कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे असा निकाल आला आहे. पक्षाचे कार्यकर्ते जनतेचा आवाज ऐकून घेण्याऐवजी नरेंद्र मोदी यांच्या फॅन फॉलोइंगची जी चमक होती त्यातच आनंदी होण्यात धन्यता मानत होते असे संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील एका लेखात म्हटले आहे.
निवडणुकीतील सहकार्यासाठी पक्षाचे नेते संघाच्या स्वयंसेवकांपर्यंत पोहोचले नाहीत. जे प्रत्यक्ष खालच्या स्तरावर काम करतात त्या कार्यकर्त्यांकडेही पक्षाने लक्ष दिले नाही. जे सेल्फी चा आधार घेत प्रचार करत होते त्यांनाच महत्व दिले गेले. निवडणुकीचा हा निकाल भारतीय जनता पार्टीसाठी एक रिॲलीटी चेक असल्याचे संघाचे सदस्य असणाऱ्या रतन शारदा यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.
लेखात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्रात भाजपचे राजकारण काही जास्तच सक्रिय झाले. राज्यात अनावश्यक राजकारण करण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशी केलेल्या हातमिळवणीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यामुळे राज्यात भाजपची ब्रँड व्हॅल्यूच कमी झाली.
ज्या कॉंग्रेस नेत्यांनी भगव्या दहशतवादाचे भूत पूर्वी उभे केले होते अशा अनेक कॉंग्रेस नेत्यांना पक्षात सहभागी करून घेण्यात आले. या नेत्यांनीच २६/११ च्या हल्ल्याला संघाचे कारस्थान असल्याचे म्हटले होते.
मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांना पक्षाच्या अजेंड्याबाबत समजावून सांगणे, मतदानाशी संबंधित सामग्री आणि मतदार ओळखपत्र वितरीत करणे आदी बाबी पक्षाची जबाबदारी आहे असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.





