मुंबई: राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवारी (17 नोव्हेंबर) असल्याने राजकीय पक्षांची लगबग वाढली आहे. या लगबगीत भाजपने उमेदवारी निवड प्रक्रियेत आघाडी घेतली आहे. भाजपच्या निरीक्षकांनी प्रत्येक नगर परिषद व नगरपंचायतीत जाऊन स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या चर्चेतून प्रत्येक जागेसाठी नगराध्यक्षपदाच्या तीन संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली असून, ती जिल्ह्याच्या प्रभारींकडे सोपवण्यात आली आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मंगळवारी होणाऱ्या भाजपच्या बैठकीत या तीन नावांपैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच, या नावांवर पक्षाने केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्षही बैठकीत सादर केले जाणार आहेत. काही ठिकाणी सर्वेक्षणात चौथ्या नावाचा पर्यायही समोर आल्याने त्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रदेश कार्यालयात होणाऱ्या या महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर ‘कोअर कमिटी’ची बैठक घेऊन नगराध्यक्षपदाचे अंतिम उमेदवार निश्चित केले जातील. येत्या दोन ते तीन दिवसांतच उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले आहे.