Mallikarjun Kharge : भाजप पेपर लीक करणाऱ्या माफियांचे जाळे पसरवत आहे; मल्लिकार्जुन खर्गे यांची बीपीएससी प्रकरणावर टीका

नवी दिल्ली : बिहारची राजधानी पाटणा येथे बिहार लोकसेवा आयोगाची म्हणजे बीपीएससीची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा काँग्रेसने सोमवारी निषेध केला. बळाचा वापर करून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्षाने म्हटले आहे. भाजप पेपर लीक माफियांचे जाळे देशभर पसरवत आहे. माफिया तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करत असून पाटण्यात बीपीएससी उमेदवारांवर लाठीचार्ज पेपर लीक आणि हेराफेरी लपविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटरवर लिहिले की, जेव्हा हेराफेरी उघडकीस येते तेव्हा भाजप निर्लज्जपणे त्याचा इन्कार करते किंवा लाठीमार करून तरुणांना शांत करण्याचा प्रयत्न करते. पेपरफुटी आणि हेराफेरी लपवण्यासाठी एनडीए सरकारने बिहारमधील बीपीएससी उमेदवारांवर क्रूर लाठीचार्ज आणि अमानुष छळ केल्याचा दावा त्यांनी केला.
सात वर्षांत 70 पेपर फुटले
खरगे पुढे म्हणाले की, तरुणांच्या विरोधात हुकूमशाहीचा वापर करून त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे. गेल्या सात वर्षांत ७० हून अधिक पेपर लीक झाल्याचा दावा खर्गे यांनी केला. बीपीएससी परीक्षेला बसलेल्या ३.२८ लाख तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. काँग्रेस सरचिटणीस आणि खासदार प्रियंका गांधी यांनीही भाजपवर निशाणा साधला.
बिहारमधील डबल इंजिन भाजप सरकार तरुणांवर दुहेरी अत्याचाराचे प्रतीक बनले आहे. बिहारमध्ये तीन दिवसांत दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांवर अत्याचार झाला असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. परीक्षेतील भ्रष्टाचार, हेराफेरी आणि पेपरफुटी रोखणे हे सरकारचे काम आहे. मात्र भ्रष्टाचार थांबण्याऐवजी विद्यार्थ्यांना आवाज उठवण्यापासून रोखले जात आहे.
या कडाक्याच्या थंडीत तरुणांवर वॉटर तोफचा वापर आणि लाठीचार्ज करणे अमानवी आहे. भाजपचे डबल इंजिन तरुणांवरील दुहेरी अत्याचाराचे प्रतीक बनले आहे असे त्या म्हणाल्या. बिहारमधील बीपीएससी परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. रविवारी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर पाण्याच्या तोफांचा आणि लाठीचार्ज केला. पाटणा येथील गांधी मैदानात जन सूरजचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, या कारणास्तव कारवाई करावी लागली असे पोलिसांचे म्हणणे आहे.





