Bihar Election: मतदानाच्या दिवशी महिलांच्या खात्यात 10,000 रुपये पाठवणार NDA सरकार; काँग्रेसची आयोगाकडे धाव

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Elections) पहिल्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपली. दरम्यान, मतदानाच्या दिवशीच महिलांच्या खात्यात ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’ अंतर्गत (Mukhyamantri Mahila Rojgar Yojana) पैसे जमा करण्याच्या निर्णयावर काँग्रेसने (Congress) जोरदार आक्षेप घेतला आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पाटणा येथील पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली आणि निवडणूक आयोगाने (Election Commission – EC) याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली.
मतदानाच्या दिवशी पैसे पाठवण्यास काँग्रेसचा तीव्र आक्षेप –
६ नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी महिलांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये पाठवले जात असल्याबद्दल गहलोत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “निवडणूक आयोगाने हे सर्व पाहावे. पूर्वी अशा प्रकरणांवर लगेच बंदी घातली जायची,” असे ते म्हणाले.
आदर्श आचारसंहितेमुळे (Model Code of Conduct) या योजनेसाठी कोणताही समारंभ आयोजित केला जात नसला तरी, पूर्वीपासून सुरू असलेल्या या योजनेअंतर्गत पैसे देणे सुरूच आहे. यापूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी १ कोटी २१ लाख महिलांच्या खात्यात १०-१० हजार रुपये जमा केले होते. आतापर्यंत १ कोटी ५१ लाख महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे, तर उर्वरित महिलांना डिसेंबरपर्यंत ही रक्कम मिळेल. याच वेळेबद्दल विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
‘महागठबंधन’ला एक संधी द्या – अशोक गहलोत यांचे आवाहन
यावेळी अशोक गहलोत यांनी बिहारच्या जनतेला ‘महागठबंधन’ला (Mahagathbandhan) एकदा संधी देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “तुम्ही नितीश कुमार यांना २० वर्षांपासून पाहिले आहे. आता तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री बनवले, तर त्यांना त्यांची आश्वासने पूर्ण करण्याची चिंता राहील. एक तरुण नेता येईल तेव्हा त्याला भविष्याची चिंता राहील.”
महागठबंधनमधील सर्व पक्षांनी बिहारच्या लोकांसाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पहिल्या टप्प्यातील प्रचारात ‘महागठबंधन’चा प्रचार सकारात्मक होता, तर एनडीएचा (NDA) प्रचार नकारात्मक होता, असे निरीक्षणही त्यांनी नोंदवले.
निवडणुकीनंतर भाजप-जेडीयूचे संबंध बिघडणार?
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक निकालानंतर भाजप (BJP) आणि जेडीयूच्या (JDU) संबंधांवरही भाष्य केले. “निवडणुकीनंतर भाजप आणि जेडीयूचे संबंध कसे राहतील, याची वाट पाहा,” असे ते सूचकपणे म्हणाले. “हे तानाशाही प्रवृत्तीचे सरकार आहे, ज्याचा कोणताही भरवसा नाही. नितीश बाबू (Nitish Kumar) लाचार आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकीनंतर भाजप-जेडीयूचे संबंध चांगले राहणार नाहीत, असा दावाही गहलोत यांनी केला.





