Bhuinj Election 2026 – भुईंज पंचायत समिती गणात राजकीय रणधुमाळीने उच्चांक गाठला असून यंदाची निवडणूक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण भाजप महिला मोर्चा आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्ष डॉ. सुरभी भोसले या भुईंज गणातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. राज्यात महायुतीमध्ये असणारे घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने या ठिकाणी दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. डॉ. सुरभी भोसले या भुईंज गणामध्ये उभ्या असून त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ॲड. शीतल वारागडे विरोधात आहेत. त्यामुळे या दोन उच्चशिक्षित महिला उमेदवार आमने-सामने आल्याने भुईंज गड कोण सर करणार ? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.भुईंज गणात डॉ. सुरभी भोसले यांचे तगडे आव्हान विरोधकांसमोर उभे राहिले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरभी भोसले यांना रोखण्यासाठीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणती रणनीती आखली आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणूक मात्र, डॉ. सुरभी भोसले यांचा भुईंज गणातील झंझावात पाहता त्यांच्या विजयाची खात्री कार्यकर्त्यांकडून दिली जात आहे.भुईंज गणात होत असलेली ही लढत स्थानिक ‘अस्मिता विरुद्ध पक्षनिष्ठा’ अशी रंगली आहे. दोन्ही उमेदवारांना आपल्या हक्काच्या गावातून मताधिक्य मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान स्थानिक विकास कामे, प्रलंबित प्रश्न आणि पक्षाची ताकद या जोरावर दोन्ही उमेदवार मतदारांना साद घालत आहेत. आता भुईंजच्या विकासाची धुरा कोणाच्या हाती सोपवायची याचा अंतिम फैसला मतदारांच्या हाती आहे. भुईंज गणात एकूण १५,०६२ मतदारांची संख्या असून दोन्ही महिला उमेदवार असल्याने महिला मतदारांचे संघटन आणि त्यांचा कल विजयाचे समीकरण ठरवण्यात मोलाची भूमिका बजावणार आहे. भुईंज, किकली गावातील मते ठरवणार विजेता भुईंज गणात दहा गावे असून भुईंज व किकली ही दोन मोठी गावे राजकीय केंद्र बिंदू ठरत आहेत. भुईंज येथे सर्वाधिक मतदार असून तब्बल ८००० मते एकट्या भुईंज गावात आहेत. तर किकली गावात सुद्धा २,१५० एवढे मतदार आहेत. जो उमेदवार या दोन गावात मुसंडी मारेल त्याचे पारडे जड राहण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.